
Ahilyanagar communal tension news : अहिल्यानगर शहरातील कोठला बसस्थानक परिसरातील रस्त्यावर गोवंशीय मांसाचे तुकडे फेकल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यावरून रस्त्यावर उतरले असून, रास्ता रोको आंदोलन केले.
मुकुंदनगरसह शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी, या मागणीसाठी दोन्ही आमदारांनी रस्त्यावर झोपून घेतले. दरम्यान, महामार्गावर दोन्ही आमदारांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी आहे. अहिल्यानगर शहरातील कोठला बसस्थानक परिसरात गोवंशीय मांस फेकल्याचे आढळले. यावरून हिंदुत्वादी संघटना चांगल्या आक्रमक झाल्या. हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत, पाहणी केल्यावर अधिकच मांस आढळले. याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यापाठोपाठ श्रीगोंद्यातील भाजपचे आमदार विक्रम पाचपुत देखील तिथं पोचले.
या दोघा आमदारांनी गोवंश हत्येचा निषेध करताना, हा प्रकार करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली. मुंकुंदनगरसह अहिल्यानगर शहरात असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका घेत, या दोघा आमदारांनी रस्त्यावर झोपून घेतले. यानंतर हिंदुत्वादी (Hindutva) कार्यकर्ते चांगलेच आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
संग्राम जगताप आणि विक्रम पाचपुते यांनी ज्या भागात रास्ता रोको आंदोलन केले, तो कोठला बसस्थानक भाग मुस्लिम बहुल होता. तिथं अनेकांची मांस विक्रीचे दुकाने आहेत. यातच हिंदुत्वादी कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले होते. यामुळे आंदोलन परिसरात तणाव निर्माण झाल्याने, शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती.
या दोघा आमदारांनी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे आणि त्याचे सहकारी अधिकारी आले होते. त्यावेळी आंदोलकांनी यशवंत डांगे यांच्याविरोधात 'अब्दुल' डांगे मुर्दाबाद अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तापले होते. आयुक्त डांगे यांनी आंदोलकांना उद्या बुधवारपासून अहिल्यानगर शहरात बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई आणि गुन्हे दाखल होईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी गोवंश कत्तलीला आम्ही देखील वेगळ्यापद्धतीने उत्तर देण्याची धमक ठेवतो, असा इशारा दिला. महापालिका प्रशासनावर टीका करताना हे 'हाजी प्रशासन' आहे, असा टोला त्यांनी लगावला. काही आंदोलकांनी आंदोलनात डुक्कर आणले होते. पोलिस आणि महापालिका प्रशासनाने ते जप्त करताना आंदोलकांशी झटापटी झाली. आक्रमक हिंदुत्वावादी आंदोलकांच्या या भूमिकेनंतर अहिल्यानगर शहरात फिक्स पाॅईंट वाढवून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता.
महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी उद्या बुधवारी सकाळपासून अहिल्यानगर शहरातील अनधिकृत कत्तलखानांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या सर्व घटनांच्या विरोधात 25 सप्टेंबरला महामोर्चाचे आयोजन केल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.