
Ahilyanagar tribal reservation protest : मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात मागण्या मान्य केल्यानंतर वेगवेगळे समाज आरक्षणासाठी मागणी करत रस्त्यावर उतरू लागले आहे. बंजारा समाजाने काल बीड अन् जालना इथं मोर्चा काढत, एसी प्रवर्गातून आरक्षण देताना 'हैदराबाद गॅझेटियर' लागू करण्याची मागणी केली आहे.
यातच माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शवताना, वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा चर्चेत आहे. परंतु, अकोले इथले आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावल्यास, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन आमदार आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचे दिसते आहे. यातून अजितदादांची कोंडी झाली आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाच्या आक्रोश मोर्चात सहभागी होत, पाठिंबा दिला आहे. परंतु त्यांनी बंजारा आणि वंजारी एकच असल्याचे वादग्रस्त विधान केले. यातून वाद निर्माण झाला असून, बंजारा समाजाकडून त्याचा निषेध केला जात आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले इथले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी आदिवासी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न करू नका. आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी सहन करणार नाही. तसं करण्याचा प्रयत्न केला, तरी रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे.
आमदार डाॅ. किरण लहामटे म्हणाले, "आदिवासींच्या आरक्षणामुळे घुसण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे. राजकीय नेत्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचे प्रकार करू नयेत." महाराष्ट्रातील बंजारा काय, कुठलाच समाज आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही, असे सांगून धनंजय मुंडे यांच्या भूमिकेला थेट आमदार डाॅ. लहामटे यांनी छेद दिला.
'धनगर आणि बंजारा समाजाला पूर्वीच आरक्षण भेटलेले आहे. विनाकारण राज्यात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल. वेळ आली तर, न्यायालयात जाऊ. आदिवासी समाजाचे आजी-माजी आमदार समाजसोबत आहेत. आम्ही आहोत तोपर्यंत आदिवासी समाजात घुसखोरी होऊ देणार नाही,' असे आमदार डाॅ. लहामटे यांनी ठणकावून सांगितले.
बंजारा आणि वंजारा एकच, यावर धनंजय मुंडे यांनी काल विधान केले होते. धनंजय मुंडेंनी पुन्हा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "कोणी काय विरोध करावा, हे माझ्या हातामध्ये नाही. मुद्दा हा आहे की, स्थानिक पातळीवर आम्ही कशा पद्धतीने राहतो? आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि बंजारा जात म्हणून वेगळी आहे. बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. बंजारा समाजाने मुंडे साहेबांवर प्रेम केलं आणि त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे आणि त्या बोलण्याचा कोणी काय अर्थ घ्यावा, अर्थ घेणारे लोक आणि घोषणा देणारे लोक कोण होते, हे सर्व आता सोशल मीडियावरून समोर आलेलं आहे. कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम एकीकडे चांगला कार्यक्रम माध्यमांना दाखवता येत नाही, काहीतरी झालं पाहिजे ना त्याशिवाय तुमचा 'टीआरपी' वाढत नाही, असे काही विघ्न संतोषी लोक ते त्यांच्यापद्धतीने करतात. इथेही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक आहेत, आम्ही बंजारा आणि वंजारा एक, असे आम्ही भटके आहोत."
बंजारा समाजातील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध ‘याडी’ कादंबरीचे लेखक पंजाबराव चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कडाडून आक्षेप घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "बंजारा आणि वंजारी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक मूल्य वेगळे आहेत आणि या दोन समाजांची तुलना करणे चुकीचे व अन्यायकारक आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.