

Rahuri constituency news : अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्राच बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. यातून मानव-बिबट्यांचा संघर्ष तीव्र बनला आहे. तीव्र उन्हाळा सुरू झाला असून, बिबट पाणी अन् शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत घुसण्याचे प्रमाण वाढणार आहे.
बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी अन् या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी इथं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अनोखा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैलगाडी पत्र पाठवण्यात आली.
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील सर्वच भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. यातून बिबट्यांनी अनेकदा शिकारीच्या दृष्टीने हल्ले देखील केले आहेत. राहुरी तालुक्यात बिबट्यांचा अलीकडे वावर वाढला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या वन्यजीव प्राणी कायद्यात बदल करण्याची गरज आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा पर्याय राबविण्याची मागणी होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राहुरीकरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बैलगाडीभर पत्र पाठवली.
बैलगाडीभर पत्र पोस्टात टाकण्यासाठी गावातून वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रतिकात्मक पिंजरा आणि बिबट्याचा पोशाख केलेले मुलं सहभागी झाली होती. याशिवाय काही स्थानिक नेत्यांनी बिबट्याचे मुखवटे देखील चढवले होते. या अनोख्या मोर्चाचं नेतृत्व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं.
पुण्यातील जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी वाढत्या बिबट्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान बिबट्याचा वेश परिधान करून नागपूर विधानभवनात अनोखे आंदोलन केले. मानवी-वन्यजीव संघर्ष, बिबट्यांची दहशत आणि जुन्नरमधील 55 मृत्यूंकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा पेहराव केला होता. हे आंदोलन देखील त्यावेळी चर्चेत आलं होतं.
अहिल्यानगर जिल्ह्यात 2025-2026 या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात अंदाजे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांत मिळून 20 जणांचा बळी गेल्याचे लोकसत्ता अहवाल सांगतात.
अहिल्यानगर जिल्ह्यात 2025-2026 मध्ये वाढत्या मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने हायटेक उपाययोजनांवर भर दिला. यासाठी आठ कोटींहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली होती. यात AI-आधारित 'वाईल्ड नेत्र' प्रणाली, सौरऊर्जेवर चालणारे सायरन बसवणे, पिंजरे वाढवणे आणि नसबंदी उपाय विचाराधीन होता. या उपाययोजनेत 500 ते 700 बिबट्यांचे स्थलांतर आणि नसबंदी करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन होता.
राज्यामध्ये 29 जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा हैदोस माजला असून अनेकांचे प्राण गेले आहेत. बिबटे आणि मानव संघर्षावर आळा घालण्यासाठी वन विभागाला 560 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासह पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात 1800 बिबटे ठेवण्यासाठी जंगलामध्ये रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत.
राज्यामध्ये सातारा, नाशिक, पुणे, बुलढाणा, नागपूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बिबटे आता मानवी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने प्रशासन अस्वस्थ झाले आहे. बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता 560 कोटींचा निधी वनविभागाला देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.