

Sangamner Political News : संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथे शनिवारी झालेल्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद दोन माजी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला.
श्रद्धांजलीच्या भाषणात करण्यात आलेल्या राजकीय वक्तव्यांवरून हा वाद झाल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखली गेली.
संगमनेरच्या (Sangamner) आंबीखालसा येथे शनिवारी सकाळी दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. धार्मिक विधीनंतर महाराजांचे प्रवचन झाले. त्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनार्दन आहेर यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या भाषणात काही राजकीय संदर्भ आल्याची माहिती आहे.
यानंतर जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) माजी सदस्य अजय फटांगरे यांनी श्रद्धांजलीपर भाषण केले. त्यांच्या भाषणातही राजकीय संदर्भ आल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. दोन्ही भाषणांमधून एकमेकांना अप्रत्यक्ष टोमणे मारण्यात आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.
कार्यक्रम संपल्यानंतर संबंधित मंडळी गावात परतली. त्यावेळी जनार्दन आहेर आणि अजय फटांगरे यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद वाढत गेला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला. कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूंना समजावून सांगत परिस्थिती शांत केली आणि दोघांनाही तेथून बाजूला केले. त्यामुळे संभाव्य हाणामारीचा प्रसंग टळला.
जनार्दन आहेर आणि अजय फटांगरे हे दोघेही पठारभागातील राजकारणात सक्रिय राहिलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. दोघांमधील राजकीय मतभेदांची चर्चा यापूर्वीही होत आली आहे. त्यामुळे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानंतर झालेल्या या वादाची चर्चा आता स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे स्थानिक राजकीय संघर्षाची चाहूल म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या वादामागील नेमके कारण आणि भाषणातील कोणत्या वक्तव्यावरून वाद झाला, याबाबत संबंधित दोन्ही माजी सदस्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.