
Devendra Fadnavis sugar factories warning : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर संगमनेरमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे तथा नाशिक पदवधीर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांचे मैत्रीप्रेम संबंध सर्वश्रुत आहे.
आता भाच्यापाठोपाठ थोरातांनी फडणवीस यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या आहेत. परंतु काँग्रेस नेते थोरातांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन एका इशाऱ्यामुळे केले आहे.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील साखर कारखान्यांना सूचक, असा इशारा दिला आहे. 'शेतकऱ्यांच्या ऊसात काटा मारणारे कारखाने मी शोधून काढले आहेत. त्या कारखान्यावर कारवाई केली जाणार आहे,' असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या इशाऱ्यावर काँग्रेस (Congress) नेते थोरात यांनी प्रतिक्रिया देताना, अभिनंदन केलं आहे. 'मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं अभिनंदन केलं आहे, त्यांना शेतकऱ्याचं खरं दुखणं कळालं आहे, असे सांगताना, हा इशारा देण्यासाठी योग्य व्यासपीठ निवडल्याचा टोला देखील लावला. महाराष्ट्रात यातून चांगला संदेश गेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना, त्यांनी खुप काळजी घ्यावी,' असा सल्ला देखील बाळासाहेब थोरात यांनी दिला.
राहाता तालुक्यातील प्रवरानगर इथल्या विखे सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील साखर कारखान्यांना हा इशारा दिला. थोरातांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडलेलं व्यासपीठ योग्य असल्याचं प्रतिक्रिया देताना म्हटलं, तो मंत्री विखे पाटील यांना खोचक टोला होता, अशी चर्चा आहे.
राज्यातील अतिवृष्टीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्याच्या सूचना अमित शहा यांनी दौऱ्यात केल्या आहेत. यावर थोरात म्हणाले, राज्याने अतिवृष्टी संदर्भातील प्रस्ताव त्वरीत पाठवला पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून नुकसानग्रस्तांना भरीव मदत केली पाहिजे. पंजाब सरकारच्या निर्णयाप्रमाणे मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. त्याच पद्धतीने दोन्ही सरकारने निर्णय घेतला पाहिजे.
'नुकसानग्रस्तांना भरपाई देताना, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला पाहिजे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुढील काही वर्षे उभा राहू शकणार नाही. त्याची शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून तो उभा राहिल मदत ही मदत असते, ती नुकसान भरपाई नसते, हे आम्हाला कळतं. मात्र मदत ही भरीव असावी एवढी अपेक्षा आहे,' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
'संगमनेर तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीने नुकसान झालं आहे. त्यात सतत पाऊस पडत राहिल्यामुळे पिके गेलीत, ही वस्तुस्थिती आहे. 2005 आणि 2006 साली देखील हीच परिस्थिती होती. त्यावेळच्या सरकारने खुप काही मदत केली होती. संगमनेर आणि अकोले तालुक्याला आता तशी अपेक्षा आहे,' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.