
Bhujbal Vs Jarange News: मंत्री छगन भुजबळ सातत्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवत आले आहेत. त्यांचा काहीही प्रभाव पडणार नाही असे सांगत आले. निवडणुकीतही त्यांनी तसाच सूर लावला होता. मात्र निकालानंतर त्यांनी व्यक्त केलेला सुर पाहता ते आता जमिनीवर आले असावेत.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने आव्हान दिले होते. मनोज जरांगे पाटील यांनी माझा लढा गरजवंत मराठा समाजासाठी आहे, असा दावा केला होता. या दाव्याला आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास मंत्री भुजबळ यांनी सातत्याने विरोध केला.
मंत्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांना सातत्याने आव्हान देत आले होते. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील हा वाद कोणत्या स्तरावर जातो, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.
जरांगे पाटील यांनी देखील प्रारंभी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदार संघातून जरंगे पाटील यांचा उमेदवार कोण? याविषयी सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता होती. मात्र ऐनवेळी जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
निवडणूक हे आपले ध्येय नाही. समाजाला आरक्षण मिळवणे हे ध्येय असल्याचे त्यांनी जाहीर केले. यातून समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन देखील त्यांनी केले होते. निवडणुकीदरम्यान सांत्वन भेटीसाठी जरांगे पाटील यांनी येवला मतदारसंघात दौरा केला.
या दौऱ्यामागे त्यांचे निश्चित राजकीय गणित आणि योजना होती. या दौऱ्यात जरांगे पाटील यांचे प्रचंड स्वागत झाले. मध्यरात्री दोन पर्यंत जरांगे पाटील येवला मतदारसंघात ठीक ठिकाणी भेटी देत सत्कार स्वीकारत होते. यावेळी त्यांनी आपल्या भावी पिढीचा आणि लेकरा बाळांचा विचार करून मतदान करा, तुमच्या मदतीला तुमची लेकरे बाळेच असतील. अन्य कोणीही येणार नाही हा धडा घेऊन योग्य मतदान करा, असे आवाहन केले होते.
आता निवडणुकीचा निकाल लागला आहे. एरव्ही सामान्यता साठ हजार मताधिक्क्याने निवडून येणारे छगन भुजबळ यांचे मताधिक्य यंदा सव्वीस हजार एवढे घटले आहे. प्रारंभी काही फेऱ्यांमध्ये ते मागे देखील होते. लाडकी बहीण आणि बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या प्रचारा नंतर देखील भुजबळ यांना हा झटका बसला आहे.
मतदान घटल्याचा हा झटका आता भुजबळ यांनी देखील मान्य केला. माझ्या मतदारसंघात जरंगे पाटील इफेक्ट झाला. तो झाला नसता तर, मी एक लाख मतांनी विजयी झालो असतो. असे सांगत त्यांनी ईव्हीएम विरोधात विरोधकांनी पेटविलेले रान आणि आंदोलन यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही असे एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत त्यांनी विरोधकांना डीवचले. मात्र हे करताना मनोज जरंगे पाटील यांचा प्रभाव आणि इफेक्ट झाल्याचे त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे मान्य केले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही आता हा चर्चेचा विषय बनला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.