

Ahilyanagar MLC Election News : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्याचे नेते दत्तात्रय पानसरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पणन महासंघाचे अध्यक्ष असलेल्या दत्तात्रय पानसरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर झाला आहे.
या संपूर्ण घडामोडींमागे अलीकडेच झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माहितीनुसार, या अविश्वास ठरावासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वतः लक्ष घातल्याचे बोलले जात आहे. दत्तात्रय पानसरे यांच्याविरोधात महासंघातील संचालकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि अखेर तो मंजूर करण्यात आला.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर, अहिल्यानगरमधील विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र दत्ता पानसरे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरत महायुतीसमोरच मोठे आव्हान उभे केले होते.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील प्रयत्नशील होते. मात्र पानसरे सुरुवातीला कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर नाट्यमय राजकीय हालचाली घडल्या होत्या.
विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्यासाठी स्वतःवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी वारंवार माध्यमांसमोर केला होता. इतकेच नाही तर अर्ज परस्पर मागे घेतल्यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र त्यानंतर अचानक घडामोडी बदलल्या आणि अखेर त्यांनी स्वतःच अर्ज मागे घेतला.
विधान परिषद निवडणुकीतील या सगळ्या नाट्यमय घटनांनंतरही पणन महासंघात दत्तात्रय पानसरे यांच्याभोवती राजकीय हालचाली सुरूच होत्या. अखेर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला आणि तो मंजूरही झाला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीवेळी भाजपला झालेली राजकीय कोंडीच आता पानसरे यांच्या अडचणींचे कारण ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय पानसरे म्हणाले की, मी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने माझ्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. मी अर्ज मागे घेतो की नाही, याची ते वाट पाहत होते. आधी जो अर्ज मागे घेतल्याचे सांगितले गेले, त्यावरील सही माझी नव्हती. सायंकाळी पुन्हा माझ्यावर दबाव आणला गेला. मी हटत नव्हतो, पण आमदार संग्राम जगताप यांनी समजूत काढल्यानंतर मी अर्ज मागे घेतला. हे कोणी केले हे सर्वांनाच माहिती आहे. योग्य वेळी यावर भूमिका घेईन.
दत्तात्रय पानसरे यांच्या या वक्तव्यानंतर आता महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड्यावर आला असून, येत्या काळात या प्रकरणाचे आणखी मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.