पंचवटी : शिवसेनेचे (Shivsena) शिवाजी चुंभळे, (Shivaji Chumbhale) भाजपचे (BJP) दिनकर पाटील (Dinkar Patil) आणि सुनील केदार (Sunil Kedar) हे बाजार समितीच्या राजकारणात (APMC) सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या विरोधात तक्रारी करीत असतात. नुकतीच त्यांनी ‘ईडी’कडे (ED) देखील तक्रार केली. त्यामुळे संतप्त झालेल्या माजी खासदार पिंगळे यांनी या नेत्यांवर खटला भरणार असल्याचे सांगितले. (NCP leader Devidas Pingle given reply to BJP leaders)
यासंदर्भात नाशिक बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. याबाबत श्री. पिंगळे यांनी विरोधक राजकीय आकसापोटी बिनबुडाचे आरोप करीत असून, ‘ईडी’ची दिशाभूल करीत आहेत. ज्या प्रकरणात उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, त्याच प्रकरणी पुन्हा आरोप करून ते अक्षरशः न्यायालयाचा अवमान करीत आहेत. या प्रकरणी तिघांविरोधात अवमान याचिका आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.
याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, भाजपचे पदाधिकारी सुनील केदार यांनी बाजार समितीत देवीदास पिंगळे यांच्या कार्यकाळात ६४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणी थेट ‘ईडी’कडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामुळे पुन्हा एकदा बाजार समितीतील कथित भ्रष्टाचार प्रकाशझोतात आला आहे. श्री. पिंगळे यांनी या सर्व आरोपाचे खंडण केले आहे.
त्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या महितीनुसार, बाजार समितीने विकासकामांसाठी राज्य बँकेकडून ५२.८१ कोटी रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज थकल्यामुळे राज्य बँकेने २००९ मध्ये बाजार समितीची तारण मालमत्ता ‘सिक्युरिटीरायझेशन ॲक्ट’नुसार ताब्यात घेतली होती. नंतर ‘डीआरडी’ कोर्टाच्या आदेशानुसार राज्य बँकेने ही मालमत्ता विक्री केली होती. परंतु, याबाबत लेखपरीक्षकांनी बाजार समितीचे ६४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता.
याविरोधात संचालक मंडळाने पणनमंत्र्यांकडे याचिका दाखल केली. पणनमंत्र्यांनी चौकशीअंती खात्री करून संचालक मंडळाला दोषमुक्त केले होते. या विरोधात उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल झाल्या होत्या. सुनावणीअंती उच्च न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. असे असतानाही काही मंडळी हेतुपुस्सर आणि राजकीय द्वेषापोटी बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
आरोप करण्याची कारणे
शिवाजी चुंभळे यांच्या कार्यकाळातील बाजार समितीचे झालेले आर्थिक नुकसान व भ्रष्टाचार वेळोवेळी उघड करण्यात आला आहे. सेंट्रल गोदावरी कृषक सोसायटीवर दिनकर पाटील त्यांच्या पॅनलमधून एकमेव निवडून आले होते, त्या वेळी त्यांनी विरोधी गटातील संचालक मंडळास शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर अदखलपात्र तक्रार दाखल आहे. या प्रकरणी संचालक मंडळातून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सुनील केदार यांचे राज्य नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत फिल्डिंग लावली होती. मात्र, त्यात पुढे काही झाले नाही. या सर्व कारणामुळे नैराश्यग्रस्त झाल्यामुळे तिघे बेछूट आरोप करीत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.