Jayant Patil News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आहेत. तीस वर्षे जुन्या प्रकरणात त्यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा कोठवली आहे. त्यामुळे कोकाटे यांचे सदस्यत्व आणि मंत्रीपद धोक्यात आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे माणिकराव कोकाटे यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले, या प्रकरणात संशयाची सुई राज्य सरकारकडे जाते. तीस वर्ष प्रलंबित असलेले प्रकरण अचानक सुनावणीला कसे येते? आणि त्यात लगेच शिक्षा कशी सुनावली जाते? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यावरच या सर्व घटना आणि घडामोडी घडले आहेत. त्यामुळे त्यांना कोणी जाणीवपूर्वक राजकीय लक्ष्य तर करीत नाही ना, असा संशय येणे स्वाभाविक आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निकाल जाणे आणि त्यांना मंत्रिपद सोडायला भाग पाडले जाते की काय, अशी स्थिती सध्या आहे.
राज्य सरकारमधील कोणी तरी यामागे असावे, असा संशय अनेकांना वाटतो आहे. सत्तेत आल्यावर वीस-बावीस वर्षांनी अचानक हे प्रकरण उचल खाते. त्यामुळे असा संशय येणे स्वाभाविक आहे, असे पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले, कृषिमंत्री कोकाटे यांच्या चुकीचे समर्थन मी कदापिही करणार नाही. मात्र कुणीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करून असा निकाल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे का? असं सवाल त्यांनी केला. यानिमित्ताने पाटील यांनी महायुतीत वादाची ठिणगी पेटवली आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला अद्याप न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. ही स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या दोन मार्चला त्याबाबत नाशिकच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र महायुतीचे घटक असलेल्या भाजपचे त्यात वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपकडून सुरू असलेल्या डावपेचांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आधीच नाराज आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबाबतही तशीच स्थिती निर्माण होते की काय? अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सूचक वक्तव्यातून केली आहे.
यानिमित्ताने महायुतीच्या घटक पक्षांमध्ये एकोप्या ऐवजी विसंवाद वाढतो की काय, अशी भीती आहे. विशेषतः प्रारंभी धनंजय मुंडे आणि त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामेसाठी सातत्याने दबाव वाढविला जात आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचेच काही लोक असल्याचे लपून राहिलेले नाही, त्यामुळे महायुतीत एक नवा वादाचा खडा पडला आहे.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता काॅमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.