

Vivek Kolhe vs Ashutosh Kale : कोपरगावमधील स्वामी समर्थ मंदिरातील भूमिपूजन कार्यक्रमात, भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि आमदार आशुतोष काळे समर्थक एकमेकांना भिडले. विशेष म्हणजे, विवेक कोल्हे यांच्या उपस्थित कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी आमदार काळे समर्थकांकडून वादग्रस्त विधानं झाल्याने विवेक कोल्हे चांगलेच आक्रमक झाले होते.
दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत केल्यानंतर, आमदार काळे यांच्या समर्थकांना विवेक कोल्हे यांनी थेट सुनावले. वादाची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी हस्तक्षेप केल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर कोपरगावमधील (Kopargaon) स्वामी समर्थ मंदिरात भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. या कामातून कोल्हे-काळेंमध्ये श्रेयवाद रंगला होता. मंदिर परिसरात दोन्ही बाजूच्या समर्थकांनी तुफान बॅनरबाजी केली होती. यातूनच कार्यक्रमाला वाद होणार याचे संकेत मिळत होते.
भाजपचे युवानेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe), नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित भूमिपूजन कार्यक्रम सुरू असतानाच, तिथं आमदार काळे यांचे समर्थक आले. त्यांनी कार्यक्रमाच्या जमिनीवरून वाद घातला. धार्मिक कार्यक्रमात वाद नको, असे काहींनी समजावले, त्यावर आमदार काळे यांच्या समर्थकाने धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून लुटायचे का?, असं वादग्रस्त विधान केलं.
आमदार काळे समर्थकाने असे विधान करताच, वादाची ठिणगी पडली, अन् कोल्हे समर्थक पुढे आले. कोल्हे-काळे समर्थक एकमेकांना भिडले. हा वाद विकोपाला जात असल्याचे पाहून तिथं कार्यक्रमाला उपस्थित असलेले विवेक कोल्हे स्वतः दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्यासाठी गोंधळात उडी घेतली.
या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी तिथं धाव घेतली. दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत केलं. परंतु कोपरगावात राजकीय श्रेयवादाची लढाई भविष्यात कोल्हे-काळे यांच्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
संतापलेल्या विवेक कोल्हे यांनी, काळे यांचे समर्थक बाळासाहेब यांना चांगलेच सुनावलं. मी इथं असताना कार्यक्रम उधळून लावायचं काम करायचं नाही. काय राजकीय फड रंगवायचा असेल, तो धार्मिक स्थळाच्या कंपाऊंड बाहेर रंगवा. इथं नाही. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या जागेत कार्यक्रम होत आहे, तर तो होत नाही, असे स्पष्ट केलं.
नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, "2007 मध्ये माजी नगराध्यक्ष आर. डी. सोनावणे आणि बांधकाम सभापती विजय वाजे यांनी, ही जागा स्वामी समर्थ केंद्राला दिली होती. वाद घालण्याचे कारण नव्हते. पण प्रत्येक ठिकाणी राजकारण अन् श्रेय घेण्याची यांना सवय लागली आहे." कोपरगावमधील बसस्थानक, पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, न्यायालयीन इमारत, अग्निशमन दलाची इमारत, पोलिसांच्या वसाहती, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेलं आहे. विकास कामांमध्ये खोडा घालू नये. कोणी श्रेय घेऊ नये. ही नगरपालिकेंची कामे आहेत. जिल्हा विकास निधीतील कामे आहेत, असे संधान यांनी सुनावलं.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले, तुम्ही प्रस्ताव देऊन, तो मंजूर करून, उद्घाटन करा. आमदार साहेबांच्या मंजूर प्रस्तावाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणे कितपत योग्य आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी एकही अधिकारी उपस्थित नाही. हा कार्यक्रम बेकायदेशीरच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.