Ashok Gaikwad : '...यासाठी रामदास आठवले अन् प्रकाश आंबेडकरांनी घेतली संविधानद्रोही भूमिका' ; अशोक गायकवाडांचं विधान!

Ashok Gaikwad Vs Prakash Ambedkar : महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्याचे ट्रेनिंग प्रकाश आंबेडकरांनी भाजपकडून घेतलं आहे, असंही अशोक गायकवाड म्हणाले आहेत.
Ashok Gaikwad
Ashok GaikwadSarkarnama

Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या संविधान बदलाच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी लक्ष करण्यास सुरुवात केली. "भाजपला चारशे पार जागा या संविधान बदलासाठीच पाहिजेत. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संविधानद्रोही भूमिका घेतली आहे. ही भूमिका आंबेडकरी चळवळी विरोधात आहे", अशी टीका महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नगर जिल्हा लोकसभा समन्वयक अशोक गायकवाड यांनी केली.

भाजपचे नेते देशात वारंवार संविधान बदलाच्या गोष्टी करत आहेत. दलित, अल्पसंख्याक समाज यामुळे अस्वस्थ आहे. या विरोधाकांच्या आरोपांवर अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर टीका केली. या पत्रकारपरिषदेला माजी आमदार दादा कळमकर, आप पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष राजू आघाव, प्रशांत चाबुकस्वार, नाथा आल्हाट, भीमराव पगार उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Gaikwad
Shantigiri Maharaj News : उमेदवारी अर्ज बाद तरीही शांतिगिरी महाराज रिंगणात, नेमकं घडलं काय ?

'भाजपचे खासदार अनंत हेगडे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनी संविधान बदल्याची भूमिका मांडली आहे. दुष्यंत गौतम यांनी संविधानामधील धर्मनिरपेक्ष शब्द आम्ही बदलणार असल्याचे सांगितले. हा मुद्दा अंगलट आल्यावर त्यांनी त्यावर माघार घेतली. भाजपच्या संविधान बदलाच्या वारंवार विधानांमुळे देशभरातील दलित आणि त्यांच्या बरोबरच अल्पसंख्याक समाज अस्वस्थ झाला आहे. संविधान बदलाच्या भूमिकेमागे भाजपला त्यांच्याच अदानी आणि अंबानी यांसारख्या लोकांपुरते मतदानाचा अधिकार ठेवायचा आहे. देशातील गोरगरीब जनतेला भाजप पुन्हा एकदा मतदानापासून वंचित ठेवण्याचा भूमिका संविधान बदलून घेतो काय, अशी भीती वाटू लागली आहे.' असे अशोक गायकवाड(Ashok Gaikwad) यांनी म्हटले.

प्रकाश आंबेडकर भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात -

'संविधान बदलाचा अजेंडा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. संविधानामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून तिथे धर्मनिष्ठ हा शब्द घालण्याचा आहे. तसा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा असल्याचा आरोप अशोक गायकवाड यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या अजेंड्याला रामदास आठवले(Ramdas Athawale) आणि प्रकाश आंबेडकर पूरक, अशी भूमिका घेत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर महाविकास आघाडीतून जागा वाटपाची चर्चा सुरू होती.

परंतु प्रकाश आंबेडकर यांनी किती जागा पाहिजे, त्यावर कधीच भाष्य केले नाही. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती केली होती. त्यांच्याही पाठीत प्रकाश आंबेडकर यांनी खंजीर खुपसल्याचा आरोप अशोक गायकवाड यांनी यावेळी केला. प्रकाश आंबेडकर भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात. महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्याचे ट्रेनिंग आंबेडकरांनी भाजपकडून घेतल्या असल्याचा दावाही अशोक गायकवाड यांनी यावेळी केला.

Ashok Gaikwad
Nashik Constituency 2024 : महायुतीची डोकेदुखी; अजित पवार गटाचे निवृत्ती अरींगळे बंडाच्या तयारीत

मुस्लिमांसह देशातील अल्पसंख्याक समाज हा भाजपचा टार्गेट -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या दहा वर्षातील विकास कामांचा प्रभाव कोठेच दिसत नाही. तसे भाजपचे सर्व सांगत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी सभांमधून वेगवेगळी विधानं करत आहेत. यातूनच संविधान आणि हिंदू-मुस्लिम हे मुद्दे पुढे आणले. यातून भाजप मुस्लिमांना टार्गेट करून हिंदू व्होट बँक खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील टप्प्यात मुस्लिमांसह देशातील अल्पसंख्याक समाज हा भाजपचा(BJP) टार्गेट असणार आहे. भाजपचे हे सर्व मुद्दे फेल ठरत असल्यामुळे आता पंतप्रधानांनी व्होट जिहाद, मंगळसूत्रासारखे विधानांचे प्रयोग केले. परंतु यातूनही काही साध्य होत नसल्याचे दिसते आहे. असे अशोक गायकवाड यांनी म्हटले.

भाजप वारंवार संविधान बदलायच्या गोष्टी करून संविधानाची पायमल्ली करत आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुण आणि युवकांना सुद्धा आता हे समजू लागलेले आहे. मतांचे विभाजन कशा पद्धतीने होईल, याचा कट भाजप प्रत्येक ठिकाणी रचत आहे. त्यासाठी त्यांनी बहुजन वंचित आघाडीचे मदत घेतली जात आहे. आंबेडकर आणि आठवले यांच्या या स्वार्थी राजकारणाला दलित आणि अल्पसंख्याक समाजातील तरुण आणि युवा वर्ग विटला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सुशिक्षित हिंदू, दलित, ख्रिश्चन, मुस्लिम, अल्पसंख्याक समाज महविकास आघाडीबरोबर निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे अशोक गायकवाड यांनी म्हटले.

वंचित बहुजन आघाडी देवेंद्र फडणवीस चालवतात!

राज्यामध्ये दलित मतांचे विभाजन व्हावे व त्याचा तोटा हा महाविकास आघाडीला व्हावा, या उद्देशाने भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) बहुजन वंचित आघाडी पक्ष चालवतात. 2019 आली लोकसभेच्या निवडणुकीवेळी मला वंचितकडून उभे राहण्याची ऑफर होती. तशी देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत वंचितचा एबी फॉर्म आणि निधी मिळवून देण्यासाठी फिल्डिंग लावली गेली होती, असा आरोप अशोक गायकवाड यांनी यावेळी केला.

परंतु मी आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता आहे. भांडवलवादी आणि साम्राज्यवादी ऑफर फेटाळून लावली. आता देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी मला संपर्क करण्यात आला होता. परंतु देशात संविधान बदलण्याचे भाजपचे षडयंत्र सुरू आहे. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी ही ऑफर मान्य केली नाही, असे अशोक गायकवाड यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com