
Sangamner nagarpalika election news : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे, संगमनेर! काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा विजयचा रथ नवखे अमोल खताळ यांनी रोखला. संगमनेरमध्ये राजकीय द्वंद आता वेगळ्या वळणावर आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महिला खुला वर्ग आरक्षित करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक राजकारणात पुन्हा राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी अन् महायुती, असा सामना इथं होताना दिसेल, असा विश्लेषणकांचा अंदाज आहे.
महाविकास आघाडीकडून गेल्या अनेक वर्षांपासून नगराध्यक्षपद माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या बहीण, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या 'मातोश्री' दुर्गा तांबे यांच्याकडे राहिलेले आहे. त्यामुळे नुकतेच झालेले महिला आरक्षण तांबे परिवाराच्या पथ्यावर आले आहे.
आमदार तांबे अपक्ष असले, तरी त्यांचे महायुतीतील (Mahayuti) मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. विशेष म्हणजे दुर्गा तांबे यांचा अनुभव, सामाजिक सहभाग आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रियता पाहता, त्यांचा उमेदवारीसाठी विचार होण्याची शक्यता आहे.
विशेषतः माजी मंत्री थोरात यांचा विधानसभा निवडणुकीतील पराभव हा त्यांच्या राजकीय प्रवासातील एक मोठा धक्का ठरला होता. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी केवळ नगरपालिकेची नाही, तर राजकीय पुनर्स्थापनेसाठीही एक ‘टर्निंग पॉइंट’ ठरणार आहे.
दुसरीकडे, भाजप-शिवसेना महायुतीतून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत आमदार अमोल खताळ आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे. त्यांनी अनेकदा याबाबत आम्ही बसून उमेदवार ठरवू, असे जाहीर केलेले आहे. त्यामुळे उमेदवार कोण हे पुढील दिवसांत स्पष्ट होईल.
तत्पूर्वी संगमनेर हे परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी, गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत विजय खेचत ते आमदार देखील झाले. त्यामुळे या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला शह देण्याची मोठी संधी महायुतीकडे आहे.
दुसरीकडे माजी मंत्री थोरात यांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध कार्यक्रमांमधून आमदार खताळ आणि मंत्री विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, संगमनेरमध्ये खताळ यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत महत्त्वाचा जनाधार निर्माण केला आहे. या निवडणुकीत महिला व युवक मतदार वर्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काँग्रेसला या वर्गाकडे ओढण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
संगमनेर नगराध्यक्षपदासाठी महिला खुल्या वर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने दोन्ही राजकीय आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. थोरात गटासाठी हे पुनरागमनाचे द्वार, तर खताळ-विखे गटासाठी काँग्रेसच्या गडावर विजय फडकावण्याची धडपड असणार आहे. शेवटी उमेदवारी निश्चित होईपर्यंत प्रत्येक गट आपापल्या बालेकिल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि विजयासाठी जोमाने तयारीला लागलेला आगामी काळात दिसेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.