Buldana News: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह सात जणांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहेत. यामुळे बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे.
प्राप्त माहितीनुसार शिवसेनेचा (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, श्रीकांत पवार, धनंजय बारोटे, भाजपचे (BJP) तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख, ॲड. मोहन पवार व संदीप उगले यांनी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटातून दाखल करण्यात आलेल्या अर्जांवर हरकत घेतली होती.
त्यामध्ये जालिंदर बुधवत, राजू मुळे, सुधाकर आघाव, सुनील गवते, नंदाबाई सिनकर, ज्ञानदेव साळवे व रुखमाबाई पिंपळे यांनी सहकारी संस्थांच्या मतदारसंघांमध्ये व ग्रामपंचायत मतदार संघांमध्ये दाखल केलेल्या उमेदवारीवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनिमय अधिनियम 1963 व त्याखालील नियम 1967 नुसार आक्षेप घेऊन त्यांचे अर्ज निवडणूक प्रक्रियेतून बाद करावे, अशी मागणी केली होती.
या मागणीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जांची तपासणी करून त्यांचे अर्ज नियमबाह्य असल्याने अपात्र ठरविले आहे. यामुळे बुलडाण्यामध्ये (Buldana) मोठी खळबळ उडाली आहे. बुधवत यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे निवडणुकीआधीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
आक्षेप घेतलेल्यांपैकी रवींद्र जनार्धन गाडेकर यांच्यावरील आक्षेप फेटाळण्यात आला असून त्यांचे नाव वैध नामनिर्देशन पत्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, इतर सात जणांची नावे विविध नियमानुसार उमेदवारीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत. बाजार समितीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कारवाई म्हणजे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखासह प्रमुख उमेदवारांना मोठा धक्का आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.