
Nagpur Nitin Gadkari Political News : ‘एखादं विकासाचं काम सुरू होत नाही, तोच लोकं काळ्या कोटवाल्यांना कोर्टात उभं करतात आणि प्रकल्पांवर स्थगिती मिळवून घेतात. न्यायालयातील वकिलांनाही धन्यवाद...’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासकामांत खोडा घालणाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. (Regret that many dreams were left unfulfilled due to court cases)
‘सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आज (ता. २१) नागपुरात आयोजित ‘मनातले गडकरी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेता प्रशांत दामले यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली. नितीन गडकरी पूर्वी नागपुरातील महाल भागात वास्तव्यास होते. आपल्या भागातील रस्ता प्रशस्त व्हावा, म्हणून त्यांनी प्रयत्न केला.
परंतु दोन किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी त्यांना इतक्या न्यायालयीन प्रक्रिया, स्टे ऑर्डर आदींना तोंड द्यावे लागले की १३ वर्षांपासून हा रस्ता आजही झालेला नाही. ‘मी देशभरात रस्ते बांधतो, पण माझ्याच घरासमोरचा रस्ता मी बांधू शकलो नाही’, अशी खंतही त्यांनी अनेकदा व्यक्त केली. हीच नाराजी त्यांनी ‘मनातले गडकरी’ या कार्यक्रमातही व्यक्त केली.
विकासाचे कोणतेही काम सुरू झालं की स्टे आणा ही मानसिकता रुजली आहे. लोक नकारात्मक याचिका न्यायालयात दाखल करतात. नागपूरला १ हजार २०० कोटी रुपयांचे मल्टिमॉडेल स्टेशन बनवायचे होते. परंतु लोक कोर्टात गेले आणि प्रकल्प अडचणीत सापडला. देशातील सर्वांत मोठे प्रकल्प विदर्भात आणि त्यातल्या त्यात नागपुरात आणण्याचा आपला प्रयत्न असतो, पण कोर्टकचेऱ्या सुचू देत नाहीत, अशीही खंत गडकरी यांनी व्यक्त केली.
अशाच काहीशा कारणांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. पहिले हे काम राज्य सरकार करणार होते. जमीन अधिग्रहणात अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. कंत्राटदार बदलत गेले. त्यामुळे २०१४ पासून आज २०२३ उजाडले तरी हा महामार्ग होऊ शकला नाही. मुळात कोणतेही विकासकाम सुरू झाले, की नकारात्मक मानसिकता आडवी येते.
चर्चेतून अनेक प्रश्न सुटतात. कुणावरही अन्याय होणार नाही, असे निर्णय घेता येतात. परंतु लोक ‘निगेटिव्ह पीआयएल’ करत राहतात, असे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रात मंत्री असताना मुंबई-पुण्यात ५५ उड्डाणपूल उभारले. ५० लाख कोटी रुपयांची कामे करू शकलो.
नागपूर शहरातील अस्वच्छ पाणी शुद्ध करून कोराडी व खापरखेडा वीज प्रकल्पाला देण्यात येत आहे. त्यातून ३०० कोटी रुपये मनपाला मिळतात. हे करताना अनेक अडचणी आल्या. पण विकासाला सर्वांची साथ मिळाली तर झपाट्याने विकास शक्य आहे, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी विकासकामांमध्ये खोडा निर्माण करणाऱ्यांना दिला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.