How will they go in front of the farmers : गेल्या १७ ते २० वर्षांपासून कॉंग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर आज माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी आज कडूंवर जोरदार ‘प्रहार’ केला. (The effect of 40 boxes was seen in Amravati)
यशोमती ठाकूर म्हणाल्या, ४० खोक्यांचा इफेक्ट अमरावतीत दिसला. कॉंग्रेसची जी तीन मते फोडली गेली, ती या खोक्यांच्या भरोवशावरच. दीड-दीड, दोन-दोन कोटी रुपये जर एका-एका मतासाठी दिले जात असतील, तर याला कुठल्या पातळीवरील राजकारण म्हणावे? गेल्या २० वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर कॉंग्रेसची सत्ता होती, ती अशा प्रकारे उलथवून लावण्यात आली.
अध्यक्षपद पटकावल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची पोरं, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार, अशा प्रकारची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली. त्यावर बोलताना, स्वतःला शेतकऱ्यांची पोरं म्हणवणारे खोक्यांच्या भरोशावर असे राजकारण करत असतील, तर शेतकऱ्यांसमोर कोणत्या तोंडाने जाणार आहेत. आम्ही इतके वर्ष झाले राजकारण करतोय. लहानपणापासून राजकारण बघत आलो. पण आमची हिंमत होत नाही दीड-दोन कोटी रुपये देऊन मते फोडण्याची. ही खोके सरकारचीच किमया आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या भावनांसोबत असा खेळ होणार असेल तर ते शेतकरी यांना माफ करणार नाहीत. आमचे जे संचालक फुटले, त्यांनाही शेतकरी माफ करणार नाहीत. ४० खोके एकदम ओक्के हा कार्यक्रम चांगला चालला आहे. गेल्या पाच वर्षात राजकारणात जी परिस्थिती आहे, ती यापूर्वी कधी बघितली नाही, असे म्हणत सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपाबाबत होत असलेल्या असमानतेवरही त्यांनी टिका केली.
आमच्यासोबतचे काही लोक आता तिकडे बसले आहे. महाराष्ट्राला अशा पद्धतीने अस्थिर करण्याचे अधिकार कुणालाही नाही. राज्याचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. त्यासाठी सर्व आमदारांना समसमान निधी द्यायला पाहिजे. आमच्या एक-दोन लोकांना निधी दिला आणि बाकीच्यांना काहीच नाही. उद्धव ठाकरेंच्या आमदारांना एक छदामही दिलेला नाही.
पाऊस मतदारसंघ बघून कधी पडत नाही. त्याचप्रमाणे निधीही मतदारसंघ किंवा कोण आमदार आहे, हे बघून ठरवता कामा नये. असे केल्यास याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणारच आहे. कारण ज्या आमदारांना निधी दिला जाणार नाही, तेथील जनता विकास कामांपासून वंचित राहील आणि ही चीड पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत (Election) दिसणारच आहे. कर्नांटकातही असेच प्रकार केले होते, त्याचे उत्तर त्यांना मिळाले. आता महाराष्ट्र (Maharashtra) त्यांना उत्तर द्यायला सज्ज झाला आहे, अशा शब्दांत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.