Devendra Fadnavis On Jitendra Awhad: मनुस्मृती-आव्हाड वादावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Jitendra Awhad On Manusmriti: जितेंद्र आव्हाड यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करणार असल्याच्या चर्चेवरुन महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलन केलं.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Devendra Fadnavis On Manusmriti : राज्यभरात सध्या मनुस्मृतीवरुन जोरदार वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बुधवारी (ता.29) शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करणार असल्याच्या चर्चेवरुन महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मनुस्मृतीचे पुस्तक फाडून आपला राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातली चीड व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाडांकडून या आंदोलनादरम्यान मनुस्मृतीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला. त्यांच्या या कृतीचा निषेध केला जात आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश केला जाणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या वाराणसी दौऱ्यावर असून उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी ते तिथे गेले आहेत. काशीतील काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी मनुस्मृती-जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावर भाष्य केलं. तसेच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा शासनाचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

फडणवीस म्हणाले, "मनुस्मृतीतला एकही श्लोक कुठल्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचारही महाराष्ट्र शासनाने केलेला नाही. आजच नव्हे तर असा विचार कधीही आलेला नाही. त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आमचे विरोधक रोज खोटं बोलतात आणि त्यासाठी मुद्दा शोधून काढतात. ज्यांनी चर्चा सुरु केली त्यांनीच आंदोलन सुरु केलं. ते आंदोलन कसं खोटं होतं हे आपण पाहिलं. आंदोलन करताना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोदेखील त्यांनी फाडला. हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही."

हवं तर मला फाशी द्या

राज्यभरात आव्हाडांच्या निषेधार्थ आंदोलनं सुरु केलं आहे. या सर्व प्रकरणाबाबत आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्याकडून चूक झाली असल्याचं कबूल करत मी माफी मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "मनुस्मृतीमध्ये स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू म्हटलं आहे, मग ती कोणत्याही जाती-वर्णाची असो. त्यामुळे महिलांबाबत अशी भूमिका घेणारा मनू मला मान्य नाही. मातेबद्दल असं लिहिलेलं मला मान्य नाही. त्यामुळे माझा मनुवादाला विरोध हा असणारच आहे. भाजप माझा वैचारीक शत्रू असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, जातीपातीच्या, धर्माच्या राजकारणामुळे भाजपला माझा विरोध आहे. त्यामुळे मी सनातन्यांच्या विरोधात उभा राहणार, तसंच ज्यांनी वर्चस्ववादाची आणि स्त्री द्वेषाची बीज पेरली त्यांच्या विरोधात मी बोलणार. मी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार हवं तर मला फाशी द्या"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com