Congress News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन लोटसचे वादळ आपल्याकडे येऊ नये याची काळजी काँग्रेसकडून घेण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यासंदर्भात दक्ष आहेत. ''आमच्याकडे असे काहीही नाही. आमच्याकडून कोणी ऑपरेशन लोटसचे बळी पडणार नाही'', असं त्यांनी आज स्पष्ट केलं.
एका माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसमधले किमान 12 ते 16 आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, आता अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबरोबरच काँग्रेसमधीलही काही आमदार फुटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
त्यामुळे या'ऑपरेशन लोटस'चे वादळ आपल्या पक्षाभोवती घोंघावण्याआधी काँग्रेसने विशेष काळजी घेतली असल्याचे नाना पटोले यांच्या स्पष्टीकरणावरून दिसून येते.
अजित पवार यांच्या संदर्भात सुरू झालेल्या चर्चेबरोबरच या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या काही आमदारांची चर्चा आज पुन्हा नव्याने सुरू झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने सर्व आमदारांशी संपर्क करण्यात येत आहे. कुणी कुठेही जाणार नाही, याची काँग्रेस पक्षाकडून संपूर्णपणे काळजी घेण्यात येत असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांबाबत सुरू असलेल्या चर्चेला अजित पवार यांनी आज स्वत: पूर्ण विराम दिला.''जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत राहणार असून इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही'', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
त्यामुळे अजित पवार यांच्यासह काँग्रेसच्या एका माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसमधले किमान 12 ते 16 आमदार फुटण्याच्या चर्चांवर तुर्तास तरी पडदा पडला आहे.
(Edited By Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.