
Mumbai News : दिल्लीचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्यापेक्षा राजकीय विषयांनी गाजलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आता ठाकरे गटाकडून उमटू लागले आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलमताईंची 'राजकीय कुंडली' मांडत संमेलनाच्या संयोजकांवर ताशेरे ओढले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संमेलनात झालेल्या 'या' चिखलावर बोलावं, अशी विनंती राऊतांनी पत्रकारांसमोर केली. आज सांयकाळी साडेपाच वाजता पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद आहे. ते या विषयावर काय बोलतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेत एक पद मिळण्यासाठी दोन मर्सिडिज गाड्या द्याव्या लागतात, असा दावा गोऱ्हे यांनी केला. यावरून आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. नीलमताईंचा निषेध करण्यात येत आहे. ठाकरे गटातील महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरल्या आहेत. शरद पवार यांनी गोऱ्हेंच्या विधानावर बोलावे, असे राऊत म्हणाले.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चिखलफेक झाली. त्याची जबाबदारी शरद पवार नाकारू शकत नाही. ते सुद्धा त्याला जबाबदार आहेत. तुमच्यावर चिखलफेक होते, तेव्हा आम्ही उभे राहतो ना? मग आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप होत असताना शरद पवार गप्प कसे राहू शकतात? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन नव्हते. संमेलनात मराठी भाषा, संस्कृती यावर चर्चा व्हायला पाहिजे. याठिकाणी राजकीय चिखलफेक झाला.महाराष्ट्रातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्यावर चिखल फेकण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन भरवलं का? साहित्य महामंडळ ही भष्ट्राचारी संस्था आहे. जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत," असा आरोप राऊतांनी केला.
नीलम गोऱ्हे यांच्यावर उपसभापती म्हणून नाही तर मी व्यक्ती म्हणून टीका केली आहे. मी २४ वर्षे राज्यसभेत आहे. सर्व कायदे आम्हालाही माहीत आहेत. आम्ही हक्कभंग पाहिला आहे. कारागृहात गेलो आहे. आता अधिवेशन सुरु नाही. त्या कशाला हक्कभंग करतील. खरंतर महाराष्ट्राने त्या बाईवर हक्कभंग आणला पाहिजे. त्या विश्वासघातकी बाई आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी यावेळी केला.
नीलम गोऱ्हेंचे विधान ही विकृती आहे. त्यांना चारवेळा आमदार केले. तरी जाताना ताटात घाण करून गेल्या, असे म्हणत राऊतांनी गोऱ्हेंवर घणाघात केला. "साहित्य महामंडळ हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यक्रम ठरवते, आयोजक हे सतरंज्या उचलायला असतात. उषा तांबेंनी संमेलनाचे कार्यक्रम ठरवले. त्यांचे पती बांधकाम विभागाचे सचिव होते. हे सगळ्यात भ्रष्ट खाते आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये. काही लोकांच्या मर्जीखातर त्या आल्या, गेल्या आणि जाताना ताटात घाण करुन गेल्या," असे राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.