फडणवीस स्वत: गोयलांशी बोलले होते; पंतप्रधानांच्या भाषणानंतर 'ते' ट्विट व्हायरल

काँग्रेसमुळे देशात कोरोना वाढल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केला.
PM Narendra Modi, Devendra Fadnavis
PM Narendra Modi, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : मुंबईत काँग्रेसने (Congress) मोफत तिकीट वाटून नागरिकांना उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाठवले. त्यामुळे देशात कोरोना (Covid 19) वाढल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत केला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. तर सोशल मीडियात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची त्यावेळची ट्विट व्हायरल झाली आहेत.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण देताना मोदी यांनी सोमवारी काँग्रेसवर चौफेर टीका केली. देशात कोरोना पसरण्यास पंतप्रधानांनी थेट काँग्रेसलाच जबाबदार धरले. त्यानंतर सोशल मीडियात फडणवीस यांचे 9 मे 2020 रोजीचे ट्विट व्हायरल झाले आहे. यामध्ये त्यांनी मजूरांसाठी मुंबईतून रेल्वेगाड्या सोडण्याबाबत पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

PM Narendra Modi, Devendra Fadnavis
भाजपला धक्का; आमदारकीचा राजीनामा दिलेल्या दोन बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तसेच गोयल यांनी लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आणि मुंबईतून लवकरच 10 रेल्वे उत्तर प्रदेशात रवाना केल्या जातील, असे सांगितल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी सर्व मजूरांना आवाहन केले होते. सर्व मजूर बांधवांना माझी विनंती आहे की, नोंदणी करून सरकारच्या माध्यमातून आपला प्रवास करावा. पायी प्रवास करू नये, असं फडणवीस म्हणाले होते.

फडणवीस यांच्यासह गोयल यांचेही 26 मे 2020 रोजीचे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यावेळी रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र सरकारमध्ये वादही रंगला होता. 'महाराष्ट्रातून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 145 पैकी 85 रेल्वे चालवल्या जाणार होत्या. पण राज्य सरकारमार्फत प्रवाशांची व्यवस्था न करण्यात आल्याने केवळ 27 रेल्वे सोडल्या. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की, कृपया गरीब मजूरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी आमची मदत करावी,' असं गोयल म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात लॅाकडाऊन होता. जागतीक आरोग्य संघटना आणि इतर देश लॅाकडाऊनचे समर्थन करत होते. जे लोक जिथे आहेत. त्यांनी तिथेच राहावे, असे सांगत असताना मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश, बिहारमधील नागरिकांना परत जाण्यासाठी मोफत तिकिट वाटले. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. हे काम करुन काँग्रेसने आपल्यावरील जबाबदारी झटकली, अशी टीका मोदींनी केली आहे.

त्याच बरोबर दिल्ली सरकारनेही नागरिकांना आपल्या गावी परत जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होते. मुंबई आणि दिल्लीतून गेलेल्या नागरिकांमुळे या राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले. हे पाप काँग्रेसने केले, असा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com