
Eknath Shinde News : विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर विक्रमी जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडीही घडल्या. तर मागील पाच वर्षांत कायम फडणवीसांचा टोकाचा द्वेष करणारे आणि त्यांना सर्वप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रय़त्न करणारे उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांची मुख्यमंत्री झाल्यावर भेट घेत चक्क पुष्पगुच्छ दिला.
एवढंच नाहीतर उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तीनवेळी त्यांची भेट घेत चर्चा केली. शिवाय ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांचाही फडणवीसांबद्दलचा सूर काहीसा बदललेला दिसत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत, उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावला आहे.
ठाकरे पिता-पुत्र फडणवीसांशी(Devendra Fadnavis) जवळीक साधण्याचा प्रयत्न करताय? या प्रश्नावर ठाण्यात मीडियाशी बोलाताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''या विषयावर आमचे प्रवक्ते बोलले आहेत आणि आता मी देखील सांगतोय, जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, मुख्यमंत्री फडणवीसांना फडतूस म्हणणारे, तू तर राहशील नाहीतर मी तरी राहील अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं. सरडापण रंग बदलतो, पण अशाप्रकारची नवीन प्रजाती पहिल्यांदा बघितली.''
तसेच ''लोकांनी ज्यांना झिडकारलं, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी आणि लोकांशी ज्यांनी प्रतारणा केली. आता जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला. त्यामुळे कुठंतरी ते आता...जसं मी म्हणालो की 'तुम लढो हम कचरा संभालते है' तसं 'तुम लढो हम बुके देके आते है' असं मी एकदा म्हटलं होतं.'' असं एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) म्हटलं.
याशिवाय ''त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तर कोणीही भेटू शकतो. मुख्यमंत्र्यांना तर कोणत्याही पक्षाचा नेता भेटू शकतो. मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य माणूसही भेटू शकतो. मलाही अनेक लोक भेट होते, आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांनाही लोक भेटतील. परंतु अतिशय टोकाचा मत्सर द्वेष आणि ज्यांना जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान करणाऱ्या लोकांना इतक्या लवकर उपरती सुचली चांगली गोष्ट आहे. त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी.'' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंन प्रतिक्रिया दिली.
तर ''महाविकास आघाडीला(MVA) विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने संस्कृती आणि संस्कार शिकवलेले आहेत. संस्कार काय आहेत, हे जनतेने दाखवलं. कारण, ते शिव्या-शाप शिवाय दुसरं काही देत नव्हते. सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या-शाप आणि आरोप याशिवाय दुसरं त्यांनी काही केलेलं नाही. परंतु आम्ही संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा व संस्कार जपले. बाळासाहेबांचे संस्कार जपले. आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर दिले नाही, आम्ही आरोपांना आणि शिव्या-शापाला देखील कामातून उत्तर दिलं. म्हणून जनतेने त्यांना संस्कार आणि संस्कृती या विधानसभेच्या निवडणुकीतून शिकवली.'' असं म्हणत महाविकास आघाडीवरही टीका केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.