Harshwardhan Sapkal Congress : प्रदेश काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत जुन्यांना संधी? उफळणाऱ्या नाराजीचा सामना सपकाळांना धक्के देणार?
Congress Committee controversy : स्थानिक स्वराज्य संस्था व पालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेस पक्ष 280 जणांची जम्बो कार्यकारिणी नियुक्तीची तयारी सुरू केली आहे. परंतु, बहुतांश नागपूर, ठाणे अन् पुण्याच्या नेत्यांना भरणा केल्याची माहिती समोर येत असून, जनाधार असलेल्यांना डावलल्याचा सूर आहे.
त्यामुळे जम्बो कार्यकारिणीवरून नाराजी उफळण्याची चिन्हं आहेत. डावलल्यांमध्ये सर्वाधिक काँग्रेसच्या युवा नेत्यांचा समावेश असल्याने त्यांची समजूत काढण्याचं दिव्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर असणार आहे.
हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या जम्बो कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षांचे मत विचारात घेतलेले नाही, असा सूर आहे. या कार्यकारिणीत 40 टक्के जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे नव नेतृत्व विकसित कसे होणार? असा सवाल केला जात आहे. या कार्यकारिणीत विदर्भातून 40 टक्के प्रतिनिधींना संधी दिल्याचे देखील सांगितले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था व पालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेस पक्ष 280 जणांची जम्बो कार्यकारिणी नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी डावलून ही जम्बो कार्यकारिणी निवडली गेली आहे. या नियुक्तीवरून पक्षात नाराजी उफाळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आता काँग्रेस आपल्या प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार करणार आहे. या कार्यकारिणीत सरचिटणिसांची संख्या 110 ते 115 पर्यंत, तर सचिवपदे 105 ते 108 पर्यंत आणि पाच वरिष्ठ प्रवक्ते व एक माध्यम समन्वयकाचा समावेश असणार आहे. वरिष्ठ उपाध्यक्षाची संख्या 15 ते 20, तर 35 ते 40 उपाध्यक्ष या टीममध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
या वेळची कार्यकारिणी जवळपास 280 पदाधिकाऱ्यांची असणार आहे. यामध्ये 60 टक्के नवे चेहरे, तर 40 टक्के जुने चेहरे आहेत. यामुळे पक्ष नवे नेतृत्व विकसित कसे करणार, असा सवाल एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. बाहेरून आलेल्या काही नेत्यांचाही समावेश या जम्बो कार्यकारिणीत करण्यात आला आहे. यापूर्वी काँग्रेसने विभागवार नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र प्रत्यक्षात त्याचा विशेष फायदा झाला नसल्याचे चित्र होते.
पक्षातील प्रभावी व जनाधार असलेल्या चेहऱ्यांना या टीममध्ये स्थान देणे आवश्यक होते; मात्र तसे होताना दिसत नसल्याची प्रतिक्रिया समोर येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या सर्व नियुक्त्या करताना, जिल्हाध्यक्षांचे मत विचारात घेतले नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी नेत्यांच्या मागे राहणाऱ्या, दिल्ली कनेक्शन असणाऱ्यांना तसेच जनाधार नसलेल्या नेत्यांना कार्यकारिणीत स्थान मिळाल्याची टीका आहे.
यादी मारुतीच्या शेपटासारखी लांबली...
हर्षवर्धन सपकाळ यांनी नव्या टीमची संख्या 60 ते 70पर्यंत मर्यादित ठेवण्याची मागणी केली होती; मात्र प्रत्यक्षात इतर नेत्यांच्या आग्रहामुळे 250पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांची यादी दिल्लीला पाठवावी लागल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या समर्थकांना स्थान देण्याच्या माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय नेत्याच्या आग्रहामुळे ही यादी मारुतीच्या शेपटासारखी लांबल्याचे, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.