मुंबई : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला, तीन आठवडे उलटून मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे गंगेत न्हाले नाही. मंत्रीपदावरुन शिंदे गट-भाजप यांच्यात होत नसलेली एकवाक्यता यामुळे राज्याचा मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे.
सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच मंत्री राज्याचा कारभार करीत आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी राज्यपालांकडे एक मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी टि्वट करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा फोटोही शेअर केला आहे. राज्य घटनेनुसार चालत आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी राज्यपालांना केला.
"बार्बाडोस सारख्या देशात जिथे लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे तिथे 27 मंत्री आहेत. पण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असूनही येथील मंत्रिमंडळात केवळ 2 जण आहेत. हे दोन्ही मंत्री राज्याशी संबंधित सर्व निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी," अशी मागणी राऊतांनी केली आहे.
संजय राऊतांनी आणखी एक टि्वट केले आहे. यामध्ये त्यांनी घटनेच्या कलम 164-1A चा हवाला देत राज्य मंत्रिमंडळात 12 मंत्री असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यापेक्षा कमी संख्या असेल, तर संविधान त्या मंत्रिमंडळाला मान्यता देत नाही. गेल्या 2 आठवड्यांपासून महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांनी (शिंदे-फडणवीस) घेतलेल्या निर्णयांची घटनात्मक वैधता नाही, असे संजय राऊत म्हणतात.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.