Lok Sabha Election News : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत पक्ष फोडाफोडीचे राजकारण खेळले गेले. जून 2022 मध्ये सत्तेतील शिवसेना फोडून भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यानंतर अचानकच अजित पवारही आपल्या शिलेदारांसह तत्कालीन राष्ट्रवादीतून बाहेर पडून सत्तेत सहभागी झाली.
सर्वकाही सुरळीत सुरू असताना भाजपने फोडाफोडी का केली, हा कळीचा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्याचे उत्तर आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत दडलेले होते. निवडणुकीनंतर एक्झिट पोलमध्ये मात्र भाजपचे सर्व मनसुभे धुळीस मिसळल्याचे दिसून येते. पोलनुसार महाविकास आघाडीस 26 तर महायुतीला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. मग भाजपने याचसाठी केला होता हट्टहास, अशी चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी ठाकरेंना दूर भाजपने सारून शिंदे-अजितदादांना जवळ केले गेले. दिल्लीत पुन्हा एकदा मोदी-शाह यांचे सरकार बसवायचे असेल, तर हा खेळ खेळावाच लागणार होता, हे भाजपच्या 'थिंक टँक'ने आधीच हेरले होते. त्यानुसार या खेळाचा फायनल ड्राफ्ट दिल्लीत तयार केला आणि तो फडणवीसांकडे पाठवला. फडणवीसांनीही रिस्क घेत हा प्लॅन तंतोतंत अमलात आणला.
राज्यात चार-साडेचार डझन आमदार पळवले गेले. ठाकरेंना सत्ताखुर्चीवरून खाली खेचण्यात आले. त्यांच्याजागी शिंदेंना बसवण्यात आले. शेजारी फडणवीस बसले होतेच, पण भरीस भर म्हणून की काय अजितदादांनाही जवळ करण्यात आले. अखेर महाराष्ट्रात नवा सत्तापट उभा राहिला आणि सुरू झाला सत्ताखुर्चीच्या खुंटा बळकटीकरणाचा नवा डाव. यातूनच राज्यातील सत्तानाट्याचा नवा राजकीय अंकाचीही सुरुवात झाली.
दिल्लीचा प्लॅन सक्सेस झाल्यानंतर राज्यातील सत्तास्पर्धा एकदमच टोकाला गेली. यातून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांतील कायम हमरीतुमरी होत राहिली. एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यापासून ते उणीदुणी काढण्यापर्यंत जाऊन घसरली.
आता या फोडाफोडीच्या राजकारणानंतर राज्यात लोकसभेच्या माध्यमातून पहिलीच निवडणूक पार पडली. ही निवडणुकीच कोण खरे आणि कोण खोटे, जनता भाजपला स्वीकारणार का, याची उत्तरे मिळणार आहेत. यातूनच लोकसभेतही जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी संपूर्ण ताकद पणाला लावली.
पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह सत्तेतील दिग्गजांनी राज्यात येऊन प्रचारसभा घेतला. रोड शो केले. तर अवसान गळालेल्या ठाकरेंनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. तर पक्षफुटीनंतर तसूभरही न डगमगता शरद पवारांनी अनुभवाची ताकद पणाला लावली आणि विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला.
आता या महामुकाबल्याचा महानिकाल लागण्याआधीच 'एक्सिट पोल'चे आकडे समोर आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजातून भाजपने रचलेल्या राजकीय डावाची पुरती हवाच निघाल्याचे स्पष्ट होत आहे. टाकलेला प्रत्येक डाव भाजपवरच उलटून पडतोय की काय अशी शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी लागणाऱ्या निकालानंतर राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कोण किंग ठरणार, हे निश्चित होणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.