Vasai Politics : वसई-विरार महापालिकेतील प्रस्तावित आचोळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या सर्वेक्षणावरून राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. भाजप आमदार राजन नाईक आणि बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव आमनेसामने आले असून, या वादामुळे रुग्णालयाच्या कामावर राजकीय सावट पसरले आहे.
भाजपकडून आरोप करण्यात आला की, 'रुग्णालयाच्या सर्वेक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न माजी महापौर रुपेश जाधव यांच्याकडून होत आहे.” तर रुपेश जाधव यांनी पलटवार करत म्हटले की, 'जमिनीच्या सीमारेषा स्पष्ट न करता सर्वेक्षण सुरू केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.' दोन्ही गटांमधील वादविवादामुळे परिसरात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नालासोपारा-आचोळे येथील आरक्षण क्रमांक ४५५ आणि सर्व्हे क्रमांक ६ या जमिनीवर १५ कोटी ८२ लाख रुपये खर्चून २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. महापालिकेकडून या प्रकल्पासाठी सल्लागार व शिल्पकार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय वसई-विरारसाठी अत्यावश्यक मानले जात आहे. मात्र, जमिनीच्या सीमारेषांबाबत तांत्रिक मतभेद कायम असल्याने प्रकल्पाचा गतीमान प्रवास पुन्हा अडकला आहे.
याबाबत भाजप आमदार राजन नाईक यांनी सांगितले की, 'रुग्णालयाच्या प्रगतीत अडथळा आणला जातोय. राज्य सरकार आणि विभागीय प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच सर्वेक्षण सुरू केले आहे. तरीही काही नेते राजकीय हेतूने अधिकारी आणि सर्व्हे टीमला धमकावत आहेत. हा मुद्दा आता जनतेच्या आरोग्याशी संबंधित असून,रुग्णालयाचे काम रोखणे म्हणजे जनतेच्या हिताशी खेळणे आहे.'
पुढे बोलताना नाईक म्हणाले, वसई-विरारच्या नागरिकांसाठी आम्ही पारदर्शक आणि जलद विकासाच्या भूमिकेत आहोत. काही जण स्वतःच्या अतिक्रमणाचे रक्षण आणि राजकीय लाभासाठी मुद्दाम अडथळा आणत आहेत. आम्ही हे प्रकरण सरकारसमोर मांडू.”
रुपेश जाधव यांनी याला प्रत्युत्तर देताना सांगितले की, आचोळे रुग्णालयाचा प्रस्ताव हा बविआ सत्ताकाळात हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्यात आला होता. आरक्षण, निधी आणि मंजुरीची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण झाली होती. आज जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, ते त्या काळात कुठे होते? या ठिकाणी रुग्णालयासाठी राखीव जमीन आणि शेजारील खासगी जागा दोन्ही आहेत. सीमारेषा निश्चित न करता सर्वेक्षण सुरू करणे हेच चुकीचे पाऊल आहे. मी केवळ अचूक नकाशा ठरवण्याची मागणी केली होती, पण त्याचाच विपर्यास करून राजकीय रंग देण्यात आला.
रुपेश जाधव यांनी आरोप केला की, भाजपकडून प्रसारित केलेल्या व्हिडिओमधील आवाज बंद करून सत्य लपवले गेले. प्रत्यक्षात भाजप कार्यकर्त्यांनीच अधिकाऱ्यांना धमकावले आहे. तर, भाजप देखील कामात अडथळा आणला जातोय या आपल्या आरोपावर ठाम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.