

Pune traffic update: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील वाढती वाहतूक आणि पुणे-नगर रोडवरील सततची कोंडी यावर मोठा उपाय म्हणून राज्य सरकारने नवा महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ते शिरूर दरम्यान १३४ किलोमीटरचा चौपदरी महामार्ग उभारण्यास राज्य सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे.
हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून सुरू होऊन वांद्रे, पाईट, पाबळ, मलठणमार्गे थेट शिरूरपर्यंत जाणार आहे. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
सध्या मुंबईकडे जाणारी बहुतांश वाहतूक पुणे शहरातूनच जाते. त्यामुळे पुणे-शिरूर पट्ट्यात दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. नव्या महामार्गामुळे ही वाहतूक थेट नेरळमार्गे मुंबई आणि जेएनपीटी बंदराकडे वळणार आहे. त्यामुळे पुणे शहरावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
या महामार्गाचा सर्वात मोठा फायदा चाकण, तळेगाव, रांजणगाव, सुपा आणि खेड एसईझेडमधील औद्योगिक क्षेत्रांना होणार आहे. उद्योगांची वाहतूक जलद होणार असल्याने गुंतवणूक आणि रोजगारालाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १,२२० कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र हा मार्ग काही ठिकाणी वनक्षेत्र आणि इको सेन्सिटिव्ह झोनमधून जाणार असल्याने पर्यावरणीय परवानग्या मिळवणे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात.महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार असल्याने भविष्यात या महामार्गावर टोल आकारला जाण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा प्रकल्प राज्यासाठी “गेमचेंजर” ठरणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि औद्योगिक पट्ट्यांना जोडणारा हा महामार्ग राज्याच्या विकासाला नवी गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे ते मुंबई प्रवासी – एक्सप्रेसवेवरील ताण कमी झाल्यास प्रवास अधिक जलद होण्याची शक्यता
शिरूर, चाकण परिसरातील नागरिक – मुंबईला जाण्यासाठी अधिक जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार
अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील प्रवासी – पुणे शहरात न येता थेट मुंबईकडे जाता येणार
जेएनपीटी बंदराकडे जाणारे ट्रक चालक – मालवाहतूक जलद आणि कमी वेळेत होणार
चाकण, तळेगाव, रांजणगाव, सुपा MIDC मधील उद्योग – वाहतूक खर्च आणि वेळ कमी होणार
पुणे-नगर रोडवरील वाहनचालक – वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
रायगड आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग – बाजारपेठ आणि शहरांशी संपर्क वाढणार
दररोज कामासाठी प्रवास करणारे कर्मचारी – पर्यायी मार्गामुळे वेळेची बचत होऊ शकते
खाजगी बस आणि मालवाहतूक कंपन्या – मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक सुलभ होणार
नवी मुंबई आणि जेएनपीटीशी जोडलेले व्यावसायिक – थेट कनेक्टिव्हिटीमुळे व्यवसायाला फायदा होणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.