मुंबई : दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या राज्यसभेच्या जागेवर काॅंग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी माघार घेतल्याने पाटील या दुसऱ्यांदा राज्यसभेवर गेल्या आहेत.
राज्यसभेची ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने आवाहन केले आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. भाजप उमेदवाराने माघार घ्यावी, अशी विनंती या दोन नेत्यांनी फडवणीस यांना केली होती.
या आवाहनाचा विचार करून भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिली.
एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून पाटील यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.