Mumbai News, 26 May : विधान परिषद निवडणूक आणि त्या बरोबरच लागलेली ठाणे जिल्हा बँकेची निवडणूक यामुळे पुन्हा एकदा पालघरमधील राजकारण तापलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वोसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची घेतली होती.
ही भेट आता चर्चेचा विषय ठरली आहे. तर या भेटीत नक्की कशाची चर्चा झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यात राहिल्याने राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तब्बल ३ वर्षानंतर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी ठाणे पालघर जिल्ह्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक हे इच्छुक आहेत.
तर दुसऱ्या बाजूला नालासोपाराचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकारणाला वेगळा रंग चढला आहे. अशातच आता रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीबाबत अधिकृतपणे दोन्ही बाजूने काहीही सांगण्यात आले नसले तरी या भेटीत शिंदेंच्या शिवसेनेला विधानपरिषदेसाठी पाठिंबा आणि जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे ठाणे-पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सध्या या बँकेवर हितेंद्र ठाकूर यांच्या पॅनलचं वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत ठाकूर यांच्या पॅनेलने जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. मात्र, सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात कोण कोणा बरोबर जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अशातच आता रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंकडून क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. विधान परिषदेत मतांची गोळाबेरीज करण्यासाठी बहुजन विकास आघाडीला एकनाथ शिंदे उमेदवारी देऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे बविआला उमेदवारी देत एकनाथ शिंदे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत निवडणुकीत देखील धक्कातंत्राचा अवलंब करू शकतात. ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे ४४४ मतांचे संख्याबळ आहे. तर शिवसेना आणि निलेश सांबरे गटाची मिळून ३४६ मते आहेत. सध्याचे आकडे बघता भाजपचं पारडं जड आहे.
त्यामुळे भाजपला बाजूला सारून विजय मिळवायचा असल्यास शिवसेनेला बहुजन विकास आघाडीला जवळ करावं लागेल. कारण बविआकडे ७१ मते असल्यामुळे शिंदेंनी बविआला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. अशातच रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्यामुळे या नेत्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? फाटक यांनी आपली आमदारकी फिक्स केली का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.