Thackeray vs Shinde : नारायण राणेंप्रमाणे उद्धव ठाकरेंवरही अटकेची कारवाई होणार? शंभूराज देसाईंच्या विधानाने चर्चेला उधाण
Thackeray Faction vs Shinde Group : महाराष्ट्रातील सरकार बेकायदेशीर आहे. सरकार आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारला लगावला. मुंबई वगळता अवकाळी पावसाने आणि गारपिटीने राज्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जवळपास १ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हे सगळं पाहता मीही अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागी येतात, पण याकडे लक्ष न देता सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे तेलंगणाला गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
राज्यातील शेतकरी संकटात असताना जो माणून स्वतःच्या घराची काळजी न करता दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. आणि अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. ज्यांना मिळाले त्यांना २०-२० रुपयांचे चेक मिळाले. गरीब शेतकऱ्यांची चेष्टा हे सरकार करत आहेत. मग कारभार कुठे आहे? स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी जेवढ्या दिल्ली वाऱ्या करताहेत, त्यावर टीका केल्यावर जे गद्दार मुख्यमंत्री आहेत, ते गरीब शेतकऱ्याचा मुलगा असा गळा काढताहेत. पण गरीब शेतकऱ्याची पंचतारांकित शेती जिथे हे हेलिकॉप्टरने जातात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधले.
आज जे असैंविधानिक मुख्यमंत्री आहेत, ते स्वतःचे घर सोडून इतरांच्या घरात डोकावताहेत. आज मुख्यमंत्री कुठे आहेत? असे विचारले, तर तेलंगणाला गेले आहेत, अशी माझी माहिती आहे. तेलंगणाला जाऊन ते कुठल्या भाषेत प्रचार करणार? काय बोलणार? सुरत, गुवाहाटी, गोवा हा चोरटेपणाचा जो प्रवास कसा आहे तो तिथल्या लोकांना सांगणार आहेत का? स्वतःचे घर न सांभाळता दुसऱ्याच्या घराच्यामध्ये डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाही, अशी गंभीर टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. हे असंसदीय शब्द आहेत. आणि त्यांचा विचार होऊ शकत नाही. त्याबाबत ती क्लिप मिळवल्यानंतर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करेन. कायदेतज्ज्ञांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबतीत योग्य निर्णय घेऊन कारवाई करण्याबाबतीत आम्ही विचार करत आहोत, असे मोठे विधान शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या मुख्यमंत्र्यांबाबत असा (नालायक) शब्दप्रयोग याआधी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने करणे योग्य नाही. ते मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्याबाबत ज्यांनी वक्तव्य केले होते (नारायण राणे ) त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका घेणे शक्य आहे. आता आम्ही व्हिडिओ-ऑडिओ क्लिप बघून त्यावर विचार करू, असे म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.