Winter Session 2022 : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनही चांगलेच तापले आहे. विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले होते. या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन शिवसेनेनं कोकणातील काही प्रकरणांबद्दल एसआयटी स्थापन करण्याचा उल्लेख करत राणे आणि सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
“सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानचं नाव आलं की आदित्य ठाकरे चवताळून उठले. पण आज नाहीतर उद्या… पण तुला तुरुंगात नक्की पाठवणारच, असा इशारा नारायण राणे यांनी आदित्य यांना दिला होता. इतकेच नव्हे तर, दिशा सालियन या एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन मुलीवर तू अत्याचार केला, तू हत्या केली. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते. तुला सोडणार नाही. आता भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे, एवढं लक्षात ठेवा” असही राणे यांनी म्हटलं होतंं. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं राणेंचं नाव न घेता उत्तर दिलं आहे.
''सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे ‘पुरावे’ म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील, पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ‘ढेकणासंगे हिराही भंगला’ अशी त्यांची गत झालेली दिसते. नागपूरच्या अधिवेशनात सरकारची लक्तरेच निघाली आहेत.'' अशा शब्दांत शिवसेनेने उत्तर दिलं आहे.
याच वेळी शिवसेनेने भाजप नेत्यांना मिळणाऱ्या क्लीनचिट आणि विरोधकांवर होणाऱ्या आरोपांवरुन भाजपचे पुन्हा वाभाडे काढले आहेत. खोके सरकारने ज्यांना आज होलसेलात क्लीन चिट दिली त्या सगळय़ांचा आणि शंभर उंदरांचा फडशा पाडून काशीला पोहोचलेल्या 40 फुटीर बोक्यांचा आनंदही औटघटकेचाच ठरेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. नागपुरातील थंडीत या बोक्यांचे व त्यांच्या खोके सरकारचे मेंदू गोठून गेले.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात खोके सरकारने दोन गोष्टी केल्या. आल्या आल्या आपल्या कंपूतील बदनाम लोकांना ‘क्लीन चिट’ देण्याचे स्वतंत्र मंत्रालय उघडून भ्रष्टाचारावरील सर्व खटले बंद केले किंवा मागे घेतले. यात प्रामुख्याने बँकांचे घोटाळे करणारे, राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा करून पैशांची अफरातफर करणारे लोक आहेत. आयएनएस विक्रांत वाचविण्याच्या नावाखाली जनतेकडून, बिल्डरांकडून जाहीर रीतीने पैसे गोळा केले, ते पैसे जेथे पोहोचायचे तेथे पोहोचलेच नाहीत. हा भ्रष्टाचार नाही असे ठरवून सरकारने क्लीन चिट दिली. बँका लुटणाऱ्यांनाही सोडले, कर्जबुडव्यांना सोडले. साधारण पंधराएक लोकांना क्लीन चिट देऊन स्वच्छता अभियान राबवले. या सगळय़ांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचेच काय ते बाकी आहे. असा टोलाही लगावला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.