वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संभाव्य
उमेदवार म्हणून सागर मेघे यांच्या नावाची चर्चा सुरू
झाल्यापासून भाजपमध्ये असंतोष पसरायला सुरूवात झाली
आहे. खासदार रामदास तडस यांनी "मेरी झांशी नही
दुंगी'च्या धर्तीवर मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याचे
समजते.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात
झाल्यापासून वर्धा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून
माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांचे नाव
समोर आले आहे. गेल्या निवडणुकीत सागर मेघे यांनी
कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली होती परंतु भाजपचे
रामदास तडस यांनी त्यांचा पराभव केला होता. या
निवडणुकीनंतर जिल्ह्याचे राजकारण बदलले. दत्ता मेघे
यांनी कॉंग्रेससोडून भाजपात प्रवेश घेतला. आता लोकसभा
निवडणुकीत सागर मेघे यांना उमेदवारी द्यावी, असा
प्रयत्न सुरू झाला आहे.
सागर मेघे यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्याबरोबर
रामदास तडस समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. काही
दिवसांपूर्वी तेली समाजाचा मेळावा वर्धा येथे पार पडला.
रामदास तडस यांना उमेदवारी न दिल्यास गावोगावी मेघे
पिता-पुत्रांचे पुतळे जाळण्यात येईल, असा इशारा यावेळी
देण्यात आला. वर्धा मतदारसंघात तेली समाजाचा प्रभाव
असून तडस याच समाजातून आलेले आहेत. यावेळी तडस
यांनी सुद्धा आपणच लोकसभा निवडणूक लढविणार
असल्याचे कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केले.
दत्ता मेघे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी
सलोख्याचे संबंध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही
सुद्धा सागर मेघे यांनी तयारीला लागावे, असे संकेत
दिल्याचे समजते. या दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद सागर मेघे
यांना असल्याने तडस यांचा विरोध मावळण्याची शक्यता
अधिक आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.