

Mumbai : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज (दि.११) प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी अलंकापूरी सजली आहे. मात्र, याच पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट रविवारी लागलं आहे. पालखी सोहळ्यादरम्यान मंदिरातील प्रवेशावरुन पोलीस आणि वारकरी यांच्यात झटापट झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी(Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2023) च्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक असल्याची भावना अजित पवारांनी व्यक्त केली आहे. तर नाना पटोले यांनी शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीसांच्या मुजोर पोलिसांची मजल गेली असून संबंधित मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले ?
महाराष्ट्राच्या संत, भक्ती परंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढीवारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्तीपरंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात.
परंतु, यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.
पटोले काय म्हणाले..?
महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीसांच्या मुजोर पोलिसांची मजल गेली आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केली आहे.
पटोले म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार(Shinde Fadnavis Government) हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे. या राज्यात दररोज गुन्हे घडत आहेत पण गृहमंत्रीपदावरील व्यक्तीला त्याची जरीही चाड नाही. वारकऱ्यांवरील लाठीहल्ला हा शांततेने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या भक्तांचा व विठुरायाचा घोर अपमान करण्याचा प्रकार आहे. असा प्रकार होऊच कसा शकतो असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.