
Shirur, 25 March : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिरूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतही माजी आमदार अशोक पवार यांना नामुष्कीजनक पराभावाला सामोरे जावे लागले आहे. खरं तर पाच जागांच्या निवडणुकीत त्यांनी बऱ्यापैकी ताकद दाखवून दिली होती. मात्र पदाधिकारी निवडणुकीत आमदार ज्ञानेश्वर कटके गटाने निर्णायक घाव घातल्याने माजी आमदार पवार हे पुरते घायाळ झाले. आता त्यांच्याकडून फुटून सत्ताधारी गटात गेलेले खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे यांनी अशोक पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
शिरूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या (Shirur Kharedi Vikri Sangh) अध्यक्षपदी राजेंद्र नरवडे यांची निवड निश्चित होती. मात्र, उपाध्यक्षपदासाठी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होता. अशोक पवार गटाची साथ सोडून चार सहकाऱ्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आलेले बाळासाहेब नागवडे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. मात्र, नागवडे यांच्यासोबत आलेल्या संचालकांची संख्या पाहता तो डाव अशोक पवारांना राजकारणात चारीमुंड्या चीत करणारा ठरला आहे.
सभापती-उसभापती निवडीनंतर उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत स्फोटक होती. त्यातून नागवडे यांनी अशोक पवार (Ashok Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशोक पवार यांनी आपल्या पॅनेलमधून उमेदवारी देऊन लोकांना वेठीस धरण्याचे काम केले. त्याचा मला नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांच्या पॅनेलमधून उमेदवारी देऊन अशोक पवारांनी तोंडात घास आणि मानेवर बुक्का मारण्याचा प्रकार केला. त्यामुळेच अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीबरोबर काम करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
दरम्यान, सभापतिपदी निवड झाल्यानंतर राजेंद्र नरवडे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार माऊली कटके यांनी मला सभापती करून माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शिरूर खरेदी विक्री संघाचा बारामती खरेदी विक्री संघाप्रमाणे नावलौकिक वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर्वजण मिळून चांगले काम करण्याला माझे प्राधान्य राहणार आहे.
खरेदी विक्री संघाच्या सभापती, उपसभापतिपदी निवडीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाडिक यांनीही अशोक पवारांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीनंतर शिरूरमधील मनमानी कारभाराचा अध्याय संपला आहे. आगामी काळात महायुतीमधील सर्व पक्ष एकजुटीने लढले तर विरोधकांचे उरले-सुरले अस्तित्वही संपून जाईल.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.