पिंपरी-चिंचवड : भंडाऱ्यानंतर (Bhandara) नुकतीच (ता. ७) नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) आग लागून ११ निष्पाप कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी ही घटना गंभीर असल्याचे सांगितले.
नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड (Pimpri- Chinchwad), पुणे (Pune) शहरासह जिल्ह्यातही होण्याची भीती त्यांनी वर्तवली. कारण तेथील अनेक रुग्णालयांचे फायर ऑ़डीटच झाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळातील प्रश्नांविषयी जागृत असलेले पार्थ त्याविषयी लगेच जाणीव करून देतात. सबंधित यंत्रणांचे लक्ष त्याकडे वेधतात. नगर रुग्णालय दुर्घटनेपूर्वी चार दिवस अगोदर म्हणजे ३ नोव्हेंबरला त्यांनी सावधगिरीचे द्विट केले होते. पिंपरी-चिंचवडमधील ११० रुग्णालयांचे फायर ऑडीटच झाले नसल्याची बातमी २ तारखेला प्रसिद्ध झाली. त्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. कोरोना रुग्णालयात देशात आग लागून अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांचे फायर ऑडीटच नाही, तर स्ट्रक्चरल ऑडीटही झाले असल्याची खात्री सबंधितांना करावी, असे सूचक ट्विट त्यांनी ३ तारखेला केले. त्यानंतर चार दिवसांतच नगर जिल्हा रुग्णालयात आग लागली. त्यावर या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ट्विट त्यांनी आज (ता.९) केले.
तर, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने मावळ तालुक्यात झालेल्या भातपीक नुकसानीबाबतही त्यांनी काल (ता.८) चिंता व्यक्त केली आहे. कापणीला आलेले भातपीक भिजल्याने हवालदिल झालेल्या मावळातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना शासनाव्दारे मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर, ३० ऑक्टोबरच्या ट्विटमध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले होते.
शहरात अपूर्ण राहिलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांना गैरसोईंना सामोरे जावे लागते आहे. सत्ताधाऱ्यांनी सुनियोजित शहराचा कारभार बिघडवून सुरु केलेली कामे अपूर्ण ठेवली आहेत,असा हल्लाबोल करत त्यांनी, हीच का स्मार्टसिटी, अशी खोचक विचारणाही त्यांनी केली होती. एकूणच पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांविषयी ते सजग असल्याचे दिसून येत आहे. त्याविषयी सत्ताधाऱ्यांचे लक्ष ते वरचेवर वेधीत आहेत. वेळप्रसंगी त्यांची खरडपट्टीही काढत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीवर व पक्षाच्या चाललेल्या तयारी व हालचालीवरही त्यांचे लक्ष आहे. या तयारीसाठी शरद पवारानंतर अजित पवार शहरात येणार आहेत. त्यानंतर पार्थ येतील,असे राष्ट्रवादीतूनच सांगण्यात आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.