Pune News, 02 Sep : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहातील गोंधळ आणि नगरसेवकांच्या मनमानीवरून महापौर रवी लांडगे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. “भाजप एक कुटुंब असून, सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांना सभागृहात बोलायची संधी देतो, तरीही मध्येच कोणीही उठते, बोलते. सहा महिने झाले, सर्वांची नाटकं पाहतोय. आता माझी सहनशीलता संपली आहे. मी आता कोणाचेच ऐकणार नाही. गोंधळ घातल्यास थेट निलंबित करणार,” असा गर्भित इशारा महापौर लांडगे यांनी भाजप नगरसेवकांना दिला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा नाईलाजाने तहकूब केल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सभा पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सभागृहातील कामकाज सुरळीत चालावे, यासाठी महापौरांनी नगरसेवकांना शिस्तीचे धडे दिले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी विरोधकांपेक्षा स्वतःच्या पक्षातील नगरसेवकांनाच लक्ष्य करत थेट निलंबनाचा इशारा दिल्याने भाजपच्या गोटात चर्चेला उधाण आले आहे.
सभागृहात प्रत्येक नगरसेवकाला आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जाते. मात्र, महापौरांची परवानगी न घेता मध्येच उठणे, बोलणे आणि गोंधळ घालणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका लांडगे यांनी घेतली आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सहा महिन्यांपासून ‘नाटकं’ पाहतोय
भाजप एक कुटुंब असल्याने सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला सभागृहात बोलण्याची संधी दिली. मात्र, त्यानंतरही काही नगरसेवकांकडून मध्येच उठून बोलणे आणि सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचे प्रकार सुरूच राहिले. “सहा महिने झाले, सर्वांची नाटकं पाहतोय,” असे म्हणत महापौरांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. यापुढे सभागृहात शिस्तभंग केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. “आता माझी सहनशीलता संपली आहे. मी आता कोणाचेच ऐकणार नाही,” असे सांगत लांडगे यांनी पक्षातील नगरसेवकांनाही स्पष्ट संदेश दिला आहे.
उपसूचनांवरही महापौरांचा ‘ब्रेक’
महापालिका सभेतील विषयांवर उपसूचना मांडायची असल्यास ती सभेच्या किमान एक दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करावी लागणार आहे. संबंधित मुद्द्याची सुसंगती, नियमबद्धता आणि प्रशासकीय बाबी तपासल्यानंतरच उपसूचना सभागृहासमोर मांडली जाणार आहे. त्यामुळे ऐनवेळी उपसूचना मांडून सभागृहाचे कामकाज प्रभावित करण्याला चाप बसणार आहे.
भाजपच्या अंतर्गत नाराजीला तोंड फुटणार?
महापालिकेत सत्ता येऊन सहा महिने उलटल्यानंतरही पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा आहे. भाजपमधील गटातटामुळे शहराचा विकास रखडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता खुद्द महापौरांनीच “सहनशीलता संपली” असे जाहीर केल्याने भाजपच्या अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.