पिंपरी : भाजपच्या (BJP) रुपाने देशावर संकट आले असून ते दूर करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी (ता.१७ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड (PCMC) येथे केले. तसेच, पिपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा गैरवापर झाला असल्याचे सांगत त्यांनी पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर सुद्धा हल्लाबोल केला. शहराचे भवितव्य घडविणाऱ्यांना पुन्हा सत्ता द्या, अशी साद घालत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच (NCP) पालिकेत सत्तेत आणा, असेच सूचित करीत आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात रहाटणीतील थोपटे लॉन्समध्ये पवार बोलत होते. राज्याच्या हक्काचा जीएसटीचा तीस हजार कोटी रुपयांचा परतावा अडकवून ठेवून केंद्र सरकारने महाराष्ट्राला एकीकडे आर्थिक अडचणीत आणले आहे. तर, दुसरीकडे ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभागासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ते महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघाती आरोप पवार यांनी यावेळी केला.
अनेक मंत्री व त्यांच्या नातेवाईकांमागे या यंत्रणांच्या चौकशीचा फेरा लागूनही राज्य सरकार पडत नाही, हे पाहून आता मोठ्यांच्या मागे ही चौकशी लावण्यात आली आहे. अजित पवारांच्या बहिणींच्या मागे हा ससेमिरा लावला गेला. पण, काय करायचे ते करा. हे सरकार पडणार, तर नाहीच. उलट पाच वर्षे ते टिकणार, काम करणार आणि पुन्हा निवडून येणार, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुंबईचा पोलिस आयुक्त (परमबीरसिंह) कधी गायब होईल, असे वाटले नव्हते. पण, तो इतिहासही घडला. परदेशात पळून गेल्याचा संशय असलेल्या या माजी पोलिस आयुक्तांना न शोधता त्यातूनही राज्य सरकारला त्रास कसा होईल, हे केंद्र सरकार पाहत आहे, असे ते म्हणाले.
राज्य सरकारचा भार हलका करण्यासाठी राज्यभर दौरा करायचे ठरविले आहे, असे सांगताना सोलापूरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काल प्रथम शहरातील माजी नगरसेवक, नंतर आजी नगरसेवक व शेवटी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर कार्यकर्ता मेळावा घेऊन त्यांनी त्यांनाही पालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी तयारीला लागण्याचा आदेश दिला.
यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे,शहरातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे-पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आदी व्यासपीठावर होते. यावेळी गौड बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आपल्या अर्धा तासाच्या भाषणात पवार यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्ला चढविला. हे महागाईचे सरकार आहे, असे ते म्हणाले. ते कामगारविरोधी आहे. कारण सध्या नोकरी ही कन्फर्म राहिलेली नाही. अशा या कामगाविरोधी कायदे करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार उरलेला नाही. तसेच ते उद्योगविरोधीही आहे. कारण उद्योगवाढीची त्यांची भूमिका नाही. बळीराजाच्या प्रश्नांकडेही त्यांचे लक्ष नाही. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाययोजना करताना ते दिसत नाही. राज्यांना व त्यातही महाराष्ट्रासारख्या बिगर भाजपशासित राज्यांना ते मदत करीत नाहीत. उलट त्यांची अडवणूक ते करीत आहेत. शेतकरी, कामगार व सर्वसामान्यविरोधी कसे ते आहे, हेही त्यांनी सांगितले.
त्यासाठी पूर्वीच्या कॉंग्रेस सरकार आणि आताच्या मोदी सरकारच्या कारभाराची त्यांनी वानगीदाखल उदाहरणमे दिली. सध्या दररोज इंधन दरवाढीच्या बातम्या येत आहेत. कच्या तेलाच्या किमती कमी होऊनही देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढत चालले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. इंधनावरील २५ टक्के, जरी कर केंद्राने कमी केला तरी महागाई कमी होईल, असा सल्ला त्यांनी दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.