कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!

नथुरामाचा राज्यघटनेवर विश्वास नव्हता, त्याला मान्य नसलेल्या राज्यघटनेप्रमाणे खासदार रहायचं हा संघर्ष मनातल्या मनात होऊ नये म्हणून खासदारकीचा राजीनामा देणं योग्य ठरेल.
vishwambhar chaudhari, Amol Kolhe
vishwambhar chaudhari, Amol Kolhesarkarnama

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार डॅा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची WHY I KILLED GANDHI या सिनेमामध्ये नथूराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (vishwambhar chaudhari) यांनी यावर भाष्य केलं आहे. चैाधरी यांनी फेसबूकवर याबाबत आपले मत व्यक्त केलं आहे.

''कोल्हेंनी नथुरामाची भूमिका करणं हा त्यांच्या व्यक्तीगत म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण नथुरामाचा राज्यघटनेवर विश्वास नव्हता, मग इकडे नथुरामाची भूमिका जगायची आणि तिकडे त्याला मान्य नसलेल्या राज्यघटनेप्रमाणे खासदार रहायचं हा संघर्ष मनातल्या मनात होऊ नये म्हणून खासदारकीचा राजीनामा देणं योग्य ठरेल. मला खात्रीच आहे की ही नैतिक द्विधा त्यांना मनातून त्रास देत राहील,'' असे विश्वंभर चौधरी म्हणाले. कोल्हेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे चौधरी यांनी सांगितले.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये विश्वंभर चौधरी म्हणतात..

पोंक्षे यांनी 'ती' भूमिका करण्याला विरोध नव्हता. दोन गोष्टींना विरोध होता. एकतर नाटकात असत्य आणि तिरस्कार ठासून भरला होता, इतिहासात जे घडलं नाही ते ही दाखवलं होतं. (वाचा: नथुरामायण- लेखक य.दि.फडके).

दुसरं म्हणजे नाटकातली भूमिका प्रत्यक्ष आयुष्यात थोडी अधिकच भडकपणे पोंक्षे वठवत होते, नव्हे आजही वठवतात. अन्यत्र त्यांनी केलेली विधानं तपासा. आयपीसीखाली ती 'चिथावणी'च्या गुन्ह्यात मोडणारी आहेत. कलाकार म्हणून कला दाखवा हो, पण मग नागरिक म्हणून चांगलं नागरिकत्वही दाखवा.

पोंक्षे हिंदुत्ववादी म्हणून विरोध होता हा आक्षेपही खरा नाही. नथुरामाच्या बाबतीत नट तर सोडा, राजकारणीही उदात्तीकरण करून बोललेले आहेत. (ऐका: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नव्वदीच्या दशकात बाळासाहेबांनी केलेली भाषणं).

नथुरामाचे पुतळे उभारले पाहिजेत असं प्रत्यक्ष आजचे बिनीचे फुशाआवादी छगन भुजबळ म्हणाले होते. तात्पर्य काय तर नथ्थूचं उदात्तीकरण ही महाराष्ट्रात रुटीन बाब आहे. तेव्हा नथुरामची समजा नुसतीच नाटकात भूमिका करून पोंक्षे बाजूला झाले असते तर टीका झालीही नसती. राष्ट्रपिता मानत नसाल तरी आयपीसीखाली एक खुनाचा गुन्हा घडला आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष जीवनात त्याचं समर्थन करता म्हणजे गुन्हा घडल्यानंतरही तुम्ही त्या गुन्ह्याला मदत करत असता आणि असे गुन्हे घडवण्याला प्रोत्साहन देत असता. आक्षेप त्यासाठी होता.

कोल्हेंनी नथुरामाची भूमिका करणं हा त्यांच्या व्यक्तीगत म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण नथुरामाचा राज्यघटनेवर विश्वास नव्हता, मग इकडे नथुरामाची भूमिका जगायची आणि तिकडे त्याला मान्य नसलेल्या राज्यघटनेप्रमाणे खासदार रहायचं हा संघर्ष मनातल्या मनात होऊ नये म्हणून खासदारकीचा राजीनामा देणं योग्य ठरेल. मला खात्रीच आहे की ही नैतिक द्विधा त्यांना मनातून त्रास देत राहील.

'कोल्हे यांचा राष्ट्रवादीशी फक्त राजकीय संबंध असून वैचारिक संबंध नाही'

अर्थात कोल्हेंचा पक्ष हा मानांकित पुरोगामी आणि त्यातही खराखुरा गांधीवादी पक्ष असल्यानं काहीतरी मार्ग निघेलच. म्हणजे एक मार्ग असाही असू शकतो की प्रत्येक प्रयोगानंतर कोल्हेंनी पत्रकार परिषद घेऊन मी कालच्या भूमिकेशी तत्त्वतः आणि पक्षतः सहमत नाही असा खुलासा करावा. किंवा सबटायटलमध्ये 'कोल्हे यांचा राष्ट्रवादीशी फक्त राजकीय संबंध असून वैचारिक संबंध नाही' अशी तळटीप सतत दाखवावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com