जालना ः राजकारणात विरोधकाच्याही चांगल्या कामाचे कौतुक करण्याची उदाहरणं तशी कमीच पहायला मिळतात. या उलट एकमेकांवर टीका करायची संधी कधी मिळते याचीच वाट नेते पाहत असतात. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या बाबतीत घडला आहे.
हवेतून ऑक्सिजन शोषूण घेणाऱ्या प्रकल्पाची संकल्पना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडली,अन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी लगेच त्याच्यावर टीका केली. यावरून आता टोपे- लोणीकर समर्थकांमध्ये सोशल मिडियावर वाॅर सुरू झाले आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. एवढेच नाही तर औषधी, इंजेक्शन आणि ऑक्सिजन देखील मिळेनासा झाला आहे. यावर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आणि प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी काही दिवसांपुर्वीच सांगितले होते. त्यानंतर टोपे यांनी नुकतेच हवेतील ऑक्सिजन शोषूण तो साठवण्याचा प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडली होती. भाजपचे परतूचे आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी टोपे यांच्या या संकल्पनेची खिल्ली उडवली आहे.
हवेतूनऑक्सिजन शोषणाऱ्या प्रकल्पाचे संशोधन टोपेंनी कुठून शोधून काढले, मला माहित नाही, असे विधान लोणीकरांनी केले. यावर टोपे समर्थकांनी लोणीकरांवर सोशल मिडियावर तोंडसुख घ्यायला सुरूवात केली आहे. तुम्ही हवेतून पाणी काढू शकता तर आरोग्य मंत्री ऑक्सिजन का नाही ? असा सवाल करत लोणीकरांनी जरा टोपेंच्या प्रकल्पाचा नीट अभ्यास करावा, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
बबनराव लोणीकर फडणवीस सरकारमध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री असतांना त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद परिसरासह जिल्ह्यात पाच ठिकाणी हेवेतून शुद्ध पिण्याच्या पाण्याचे पाणी साठवणारे प्रकल्प कार्यन्वित केले होते. मात्र त्यातून अद्याप एकही एक थेंब पाणी पिण्यास मिळाले नसल्याचा दावा टोपे समर्थकांनी केला आहे.
हवेतून पाणी निघाले का?
तुम्ही हवेतून पाणी काढू शकता तर आरोग्य मंत्री हवेतून ऑक्सिजन का काढू शकत नाही का? असा टोला देखील लोणीकरांना लगावण्यात आला आहे. लोणीकरांनी ऑक्सिजन प्लांटचा अभ्यास करावा,राज्यासह जालना शहरात असलेले ऑक्सिजनचे प्रकल्प एकदा पाहावेत, असा सल्लाही टोपे समर्थकांनी लोणीकरांना सोशल मिडियाच्या माध्यमातून दिला आहे.
लोणीकरांनी नुकतीच जालना येथे पत्रकार परिषद घेतली होती. आरोग्य मंत्र्यांनी हवेतून ऑक्सिजन शोषणाऱ्या प्लँटचं संशोधन कुठे केलं मला माहित नाही, याबद्दल मी पहिल्यांदाच ऐकलं आहे, अशी टिका त्यांनी केली होती. राज्यात दररोज एक लाख लोक कोरोनाबाधित होत असून रोज ५०० बाधितांचा मृत्यू होतोय.
रुग्णांना ऑक्सिजन,बेडस आणि इंजेक्शन मिळत नाहीये. गोरगरिबांना औषधोपचार मिळत नसल्याने राज्याचे आरोग्य मंत्री आरोग्य सुविधा देण्यात नापास झाले आहेत. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलं असून देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याचा दावा लोणीकरांनी केला होता. यावर टोपे यांनी कुठलेही भाष्य केले नसले तरी त्यांचे समर्थक मात्र लोणीकरांना सडेतोड उत्तर देत आहेत.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.