

सातारा : दोन दिवस मायलेकरं जिल्हा रुग्णालयात होती... बायकोने पतीचा व मुलाने बापाचा मृत्यू पाहिला... कोणी नातेवाईक नाही... अनोळखी व्यक्तींनी चितेला अग्नी दिला... काय चाललंय समजत नव्हतं. कोरोना संशयित बापावर अग्निसंस्कार झाल्यानंतर त्या 22 वर्षांच्या युवकाची व त्याच्या आईची खरी परवड सुरू झाली. त्यांचा अहवाल आला नसल्यामुळे प्रशासनातील माणुसकीही मेली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी काय करायचे, कुठे जायचे, असा प्रश्न दोघांपुढे होता. रात्री दहाच्या सुमारास अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या दोघांच्या रात्रीच्या राहण्याची भ्रांत मिटली. या सर्व प्रकरणात प्रशासन किती निष्काळजी व मुर्दाडपणे वागते हे समोर आले.
मुंबईची कोरोनामुळे अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे गाव सोडून मुंबईत वसलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. कामाची अडचण व मृत्यूची भीती यामुळे नाईलाजास्तव त्याला गावाची वाट धरावी लागत आहे. जिल्ह्यातील असे लाखो लोक आपली कर्मभूमी सोडून मातृभूमीकडे आले आहेत. मुंबईत मोलमजुरी करणारे जांभळी (ता. वाई) येथील कुटुंब दहा दिवसांपूर्वी असेच गावाकडे आले.
प्रशासनाच्या निर्देशानुसार होम क्वारंटाइन झाले. दोन दिवसांपूर्वी वडिलांना त्रास होऊ लागला. त्यामुळे आई व वडिलांना घेऊन त्यांचा 22 वर्षांचा मुलगा वाई ग्रामीण रुग्णालयात आला. तेथील डॉक्टरांना परिस्थिती गंभीर वाटली. कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती बिघडतच गेली. एका दिवसात वडिलांचा मृत्यू झाला.
काल दुपारी दोनच्या सुमारास वडील गेल्याचे त्याला समजले. आईला काय सांगायचे आणि कसे सावरायचे, असा प्रश्न त्या मुलासमोर पडला होता. कोरोनाचे संशयित म्हणून वडिलांना दाखल करण्यात आले होते. त्यामुळे अंत्यसंस्कार शासकीय नियमानुसार होणार असल्याचे त्याला सांगण्यात आले.
दुःख करायलाही संधी नाही
जवळचे कोणी नातेवाईक नाही, बोलावले तरी येणार कोण, असा प्रश्न त्या मुलासमोर उभा होता. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूचे दुःख करत बसायलाही त्याच्याकडे संधी नव्हती. एवढ्यात नगरपालिकेतून त्याच्या मोबाईलवर फोन येऊ लागले. वडिलांचा अहवाल अद्याप पॉझिटिव्ह आला नव्हता. त्यामुळे ते कोरोनाबाधित नव्हते. नगरपालिकेकडून त्यांना कोणाला तरी संगम माहुलीला पाठवा, असे सांगितले गेले. त्या ठिकाणी सरणासाठी लाकूड घ्यायला तीन-चार हजार रुपये द्यायची तयारी ठेवा, असे सांगण्यात आले.
गावाकडून आलेला तो मुलगा त्यामुळे पुन्हा सुन्न झाला. खिशात तीनच हजार होते. नातेवाईक सगळे वाईकडे. कोण येणार, हा प्रश्न त्याला सतावू लागला. मृत झालेल्या वडिलांच्या खिशात काही पैसे होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ते काढून घेतले. सॅनिटाईझ केले. त्यातूनच सरणाचे पैसे भागविले. त्यानंतरही त्यांची परवड थांबली नाही. कोरोना संशयित म्हणून वडिलांचा मृत्यू झालाय. अंत्यंस्कार झाल्यानंतर आपण घरी जायचे का, कुठे थांबायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. शासकीय यंत्रणेकडून त्यांना काहीच सांगण्यात आले नाही.
रात्री नऊ-दहापर्यंत त्यांचा अहवाल येण्याची शक्यता होती. किमान तोपर्यंत तरी या माया-लेकराला थांबवून घेणे आवश्यक होते. वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जवळच्या संपर्कात असल्यामुळे ती दोघेही बाधित असण्याची शक्यता होती. त्यांना मोकळे सोडले, तर अन्य लोकांना धोका होऊ शकत होता. पण या गोष्टीची काळजीही प्रशासनाने घेतली नाही. त्यांना थांबविण्याची प्रशासकिय अधिकाऱ्यांनी कोणतीच तसदी घेतली नाही. त्यांना जिल्हा रुग्णालयात आणून सोडून देण्यात आले.
पालकमंत्र्यांच्याही कोणी ऐकले नाही....
साताऱ्यातून गाव पन्नास किलोमीटरवर. एसटी बस सातनंतर बंद. जायचे कसे, हॉटलेही बंद, खायचे काय, जिल्हा रुग्णालयात पाणीही प्यायला मिळत नव्हते. सकाळपासून दोघांनी काही खाल्लेही नव्हते. खिन्नपणे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील एका झाडाला टेकून दोघे मायलेकरं रडत बसली होती. "सकाळ'च्या प्रतिनिधीच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क केला.
फोन उचलला गेला नाही. काही वेळाने पुन्हा फोन केल्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ""खावलीत फुल्ल आहे, काय करणार? उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगतो,' एवढेच म्हणाले. अधिकाऱ्यांकडून काही होत नाही, असे दिसल्यावर पालकमंत्र्यांना फोन केला. त्यांनीही अधिकाऱ्यांना फोनवर सांगितले; परंतु रात्री दहापर्यंत कोणीही त्यांच्या मदतीला आले नव्हते. "सकाळ'च्या प्रतिनिधीनेच त्यांच्या खाण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
जिल्हाधिकारी साहेब, हे योग्य आहे का...
रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले. धावपळ सुरू झाली. माया-लेकरांचा शोध सुरू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच ते बसलेत, याची माहितीही प्रशासनाला नव्हती. "सकाळ'च्या प्रतिनिधीनेच ते दोघे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखविले. वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे किमान त्यांची रात्री झोपण्याची भ्रांत मिटली. आरोग्य विभागाने त्यांना दहा वाजता ताब्यात घेतले. रुग्णवाहिका येऊन त्यांना खावलीत विलगीकरण कक्षात खोली मिळायला पहाटेचे दोन वाजले.
वडील व पती गेल्यावर कोणत्याही व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. अन्य वेळी सांत्वनाला, मदतीला नातेवाईक जवळ असतात; परंतु अशा परिस्थितीत प्रशासनानेच त्यांचे पालक होणे आवश्यक होते. शासकीय कागदातील नियमाप्रमाणे चालण्यापेक्षा अशा वेळी त्यांच्याकडून माणुसकीची अपेक्षा होती; परंतु ती माणुसकी जिल्ह्यातील प्रशासनाकडून दिसली नाही. जिल्हाधिकारी साहेब, हे योग्य आहे का, एवढेच म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.