मुंबई : विधीमंडळाच्या सभागृहातून मी एकाही पोलिसाचे निलंबन करणार नाही, त्यामुळे पोलिस दलाचे खच्चीकरण होते. आम्ही राज्यातील पोलिस दलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सोमवारी (ता. १४ मार्च) विधानसभेत बोलताना केली. (I will not suspend any one police from the legislature : Home Minister's announcement)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर कटकारस्थानचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते. त्यावेळी अमरावतीच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी विरोधी बाकावरून झाला. त्यानंतर वळसे पाटील यांनी वरील घोषणा केली.
वळसे पाटील म्हणाले की, पोलिस दलासंदर्भातील प्रश्न सभागृहात मांडा. पण, काही जण पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी करतात. मग राज्यातील पोलिस दलाने काम करायचे तरी कसे?, त्यामुळे मी विधीमंडळाच्या सभागृहातून एकाही पोलिसाचे निलंबन जाहीर करणार नाही, असे सांगून आम्ही पोलिस दलाच्या पाठीशी उभे राहणार आहोत.
कोविडमध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली होती. मला वाटलं होते, सभागृहात पोलिसांचे विरोधी पक्षनेते थोडे कौतुक करतील; परंतु त्यांनी ते कौतुक केले नाही याचेही आश्चर्य वाटले. कोविड काळात ३९४ पोलिसांनी बलिदान दिले, हेही दिलीप वळसे पाटील यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की पोलिस भरतीबाबत सतत सोशल मीडियावर व इतर ठिकाणी वारंवार विचारलं जात आहे. मात्र ५२९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ७२३१ पोलिसांची आणखी भरती करण्यात येईल. ही भरती करत असताना त्यात कुठलाही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, याचीही काळजी घेऊ. आणखी भरती करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला देण्यात येईल.
पोलिस शिपायांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ३० वर्षांनंतर प्रत्येक शिपाई, कॉन्स्टेबल निवृत्त होताना उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होईल. वरिष्ठ अधिकारी खूप आहेत. पण उपनिरीक्षक खूप कमी आहेत, असेही वळसे पाटील यांनी विधानसभेत बोलताना नमूद केले.
अनिल देशमुख व त्यांच्या नातेवाईकांवर आतापर्यंत ९० छापे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईसंदर्भात वळसे पाटील म्हणाले की, घटना काय होती? तर अँटेलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या. त्या प्रकरणात मनसूख हिरेनचा खून झाला. केस एनआयएकडे गेली.अंबानींच्या घराच्याखाली जिलेटिनच्या कांड्या का ठेवल्या? याचे नेमके कारण एनआयएने अद्याप सांगितलेले नाही. या प्रकरणातील एक आरोपी पोलिस अधिकारी पत्र लिहून गृहमंत्र्यांवर आरोप करतो आणि त्यातील सत्यता न पडताळता सक्तवसुली संचनालयाची (ईडी) रेड पडते. ईडीने आजवर देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर ९० छापे घातले आहेत. तपास कसा करावा हा भाग त्यांचा असला तरी एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणेचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे यातून दिसते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.