

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने प्रचंड विजय मिळवत महाआघाडीचा सुपडा साफ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जोडीला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. मात्र या निकालामध्ये राजकीय प्रचार, सभा, रणनीती यांसोबतच एका वेब सिरीजचीही जोरदार चर्चा होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'महाराणी' या सिरिजने बिहारमधील राजकीय वातावरण ढवळून काढले अशी चर्चा सुरु आहे.
बिहारच्या राजकारणाभोवती फिरणारी आणि सध्या प्रचंड चर्चेत असलेली 'महाराणी' ही वेब सिरीज ऐन निवडणुकीच्या तोंडावर आल्याने तिची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. ही सिरीज पाहताना प्रेक्षकांना बिहारच्या राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचार आणि सत्तेची लालसा या मुद्द्यांवर भाष्य करते. बिहारच्या वास्तविक राजकारणाशी अनेक साम्य असणारी ही सिरीज अनेक गोष्टींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, याचमुळे निवडणुकीच्या वातावरणात सिरीजमुळे राजकीय गणितं बिघडली आणि मतदारांवर याचा काही प्रमाणात परिणाम झाला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या सिरीजमधील मुख्य कथानक राणी भारती ही दिल्लीला जाते आणि तिची मुलगी रोशनी भारती बिहारची नवीन मुख्यमंत्री बनते. हे कथानक बिहारच्या राजकारणात अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या घराणेशाहीच्या राजकारणाची झलक दाखवते. सिरीजमध्ये, राणी भारतीच्या पक्षातील तिच्या दोन अत्यंत विश्वासू लोकांनी घराणेशाहीच्या या राजकारणाला विरोध केलेला दाखवला आहे, तरीही राणी भारती आपल्या मुलांनाच पुढे आणते. लालू प्रसाद यादव यांच्या काळापासून सुरू झालेली कुटुंबीयांची पुढारी व्यवस्था पत्नी राबडी देवी यांच्याकडे आलेली सत्ता ते तेजस्वी यादव यांना पुढे आणणे या सगळ्याशी सिरीजमधील प्रसंग जुळताना दिसतात.
सिरीजमध्ये घराणेशाहीसोबतच, भ्रष्टाचार हे सिरीजमधील एक प्रमुख कथानक आहे. यामध्ये कोळसा घोटाळ्यापासून बँक घोटाळ्यापर्यंत भ्रष्टाचाराचा मोठा मुद्दा उभा केला आहे. कोळसा घोटाळे, आर्थिक गैरव्यवहार, ईडीची कारवाई अशा घटना दाखवल्यामुळे त्याचा प्रेक्षकांवर चांगलाच परिणाम झाला. राणी भारतीच्या मुलाची अटक आणि नंतर नव्या मुख्यमंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचा शिक्का बसणे हे प्रेक्षकांना वास्तवातील प्रकरणांची आठवण करून देतात. बिहारच्या राजकारणातील भ्रष्टाचाराच्या घटना थेट लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर सिद्ध झालेल्या आरोपांची आठवण करून देतात.
विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वीच लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात झालेल्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या. त्यामुळे 'महाराणी'मधील घटनांमुळे मतदारांच्या मनात भ्रष्टाचाराचा मुद्दा ठळकपणे उभा राहिला.
सिरीजमध्ये भ्रष्टाचारामुळे राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत कसे अडथळे येतात, हे प्रभावीपणे दाखवले आहे. एकूणच, 'महाराणी' सिरीजमध्ये दाखवलेल्या घराणेशाही, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा या तीन प्रमुख गोष्टी थेट लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात गेलेल्या राजकीय परिस्थितीशी मिळत्याजुळत्या आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही सिरीज आल्यामुळे, मतदारांच्या मनात पुन्हा एकदा घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे ताजे झाले. त्याचाच परिणाम आज झालेल्या निवडणूक निकालामध्ये दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दे पुन्हा समोर आल्याने महाआघाडीला फटका बसला आहे.
दरम्यान या सगळ्या परिस्थितीमुळे एनडीएने विक्रमी बहुमत मिळवत विरोधकांना चितपट केले आहेच. पण महाराणी सिरिजमध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टींमध्ये आणि बिहारच्या वास्तविक राजकारणात साम्य असल्याने ही मालिका निवडणुकीच्या काळात विशेष चर्चेत आली. मतदारांच्या मनात अनेक प्रश्न पुन्हा जागे झाले आणि निवडणूक वातावरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असे म्हणाता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.