

विषारी दारू हत्या कांडातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची सरकारकडून मदत करण्यात येईल अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून ते बार्शी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आहेत. राऊत यांनी स्थानिम स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बार्शी तालुक्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकून रेकॉर्ड केला होता. त्यामुळे विधानपरिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून प्रबळ दावेदार पैकी राजेंद्र राऊत हे एक आहेत. राऊत यांनी उमेदवारी अर्ज घेतलं असले तरी आज अर्ज मात्र त्यांनी दाखल केलेला नाही. सोमवारी शेवटच्या दिवशी राजेंद्र राऊत हेच भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करतात की ऐनवेळी बदल होणार हे पाहावं लागेल
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राजुरा शिवारात 26 एप्रिल रोजी एका अज्ञात तरुणीच शिर नसलेली आणि अर्धवट जळालेले मृतदेह आढळला होता. या प्रकरणात शिवानी कलमेकर हिला मृत घोषित करत तिचा भाऊ अजय कळमेकरसह वडिल बापुराम कळमेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता तब्बल एक महिन्या नंतर शिवानी कलमेकर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. या प्रकरणात शिवानीचे भाऊ आणि वडील यांना देखील शेगाव न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं असून तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका एलसीबीच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांंवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी कारवाई करत त्या कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचल बांगडी करत मुख्यालयात बदली केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली असून आज कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच एकत्रित लढवायची, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. शिवाय महायुतीच्या पॅनलच्या नावाची आज घोषणा करण्यात आली.
वांगणीतल्या अनधिकृत चाळींवर अखेर महसूल विभागानं हातोडा टाकलाय. वांगणी पश्चिमेकडील एकविरा नगर भागात धडक कारवाई करत महसूल विभागानं 100हून अधिक घरं जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईमुळे चाळमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
कांद्याला कमीत कमी 1585 रुपये भाव निश्चित केला असून काळाबाजार रोखण्यासाठी खरेदी केंद्रावर इन कॅमेरा कांदा खरेदी करण्यात येणार आहे, तसेच कांद्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी नाशिकचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना कडक लक्ष देण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली असून, खरेदी केंद्रावर कांदाचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री रावल यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांच्या मागण्या रास्त असून त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यासाठी त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती मंत्री दादा भुसे यांनी केली आहे
महायुतीला सांगली-सातारा विधानपरिषदेतून मोठा आणि जबर धक्का बसला आहे. येथे महायुतीत बिघाड होण्याची शक्यात आहे. कारण या ठिकाणी सांगलीतून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पक्षाचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.
जळगावची जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी भेट घेणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या स्थळी उन्हात बसलेल्या एका महिलेला भोवळ आली आहे. संबंधित महिलेला आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होत्या. मुंबईतील एका बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो, असा गौप्यस्फोट पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. भाजप प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना तनपुरे यांनी ही गोष्ट बोलून दाखवली आहे.
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर याला त्यांच्या भावाकडूनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात साक्ष देऊ नको, असा इशारा देताना ही धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यात त्यांच्या ताब्यात तब्बल २० ते २५ गाड्यांचा समावेश होता. ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा वास्तू संग्राहलयाच्या पाहणीसाठी आले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. त्यामुळे महायुतीच्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा विसर पडल्याचे मानले जात आहे.
कांदा निर्यातीवरील निर्बंध आणि वाढलेली आवक यामुळे बाजारभाव कोसळल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार सचिन आहेर यांनी केला. सरकारने हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष खरेदी होत नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. कांदा सडून नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे आश्वासनही पूर्ण झाले नाही. कांद्याला किमान 24 रुपये किलो दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडत हा लढा केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहणार नसून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. देशमुख यांच्या नामांकन अर्ज भरण्यासाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर अनुपस्थित होत्या. देशमुख यांनी, भाजपमधील अंतर्गत कलह हाच, आम्हाला फायदा होईल, असा दावा केला आहे.
रायगड मधील अलिबागचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने आज विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. आम्ही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरेंच्या विरोधात आहोत. त्यांनी कायम अन्याय केला आहे. एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात? हे पाहून पुढचा निर्णय घेऊ. अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा आम्ही प्रचार करणार नाही. आम्ही तटस्थ भूमिका घेऊ, असा सूचक इशारा आमदार दळवी यांनी दिला आहे.
कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून स्वतःच्या विवाहित मुलीची हत्या करून फरार झालेल्या बापाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणारे विनोद वसईकर यांनी तीन दिवसांपूर्वी आपल्या मुलगी गायत्रीची हत्या केली होती. हत्येनंतर ते फरार झाले होते. या प्रकरणाचा तपास करत बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली.
शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने मुंबईकडे निघालेले लाड पुन्हा माघारी फिरले आहेत. अंतरवली सराटीत जाऊन पुन्हा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. काही वेळापूर्वीच उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी विविध मागण्या मान्य करण्यासाठी रखरखत्या उन्हात आंदोलन सुरू केल्याने मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. मराठा समाजाने हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीतील सेनगाव शहरातील टी पॉइंटवर मराठा बांधवांच आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे गावठी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत महापालिकेकडून जाहीर करण्यात आली. याबाबतची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने देखील मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यात यावी, असे आवाहन केले आहे. तसेच शहरातील गावठी दारू बनवणाऱ्या व्यक्तींविरोधात तक्रार दिल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा देखील त्यांनी दिला.
पालघर जिल्हा प्रशासनाने 1 जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास बंदी लागू केली असून, ही बंदी 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहे. पावसाळ्यातील वादळी हवामान, मच्छिमारांची सुरक्षितता आणि समुद्रातील मासळीच्या प्रजनन काळाचे संरक्षण या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार या कालावधीत सर्व यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित छोट्या नौकांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक यांचा कारभारामुळे जिल्ह्याचे नुकसान होत असून, अनैतिक धंद्याना मोहन दहिकर यांचा पाठींबा आहे, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केला. दहीकर यांच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत बाराशे गुन्हे रजिस्टर झाले असून, माहिती दिली जात नाही, तसेच गुन्ह्यांची उकल होत नाही. माझा आक्षेप पोलिस विभागावर नसून, त्यांच्या बाॅसवर आहे. अवैध दारू ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे. हे रॅकेट कार्यरत आहे, असाही घणाघात, आमदार नीलेश राणे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्षप्रवेशाच्या आधी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि जननेत्या रेट्यामुळे तसेच विकासकामांमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करावे, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. ते म्हणाले, महाधिवक्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. कारण याला न्यायालयात आव्हान दिले जाते. चर्चा होत राहिली उपोषण करायेच असेल तर तूर्त सावलीत बसून करा, चर्चा होत राहील. उपोष सुरू ठेवा पण सावलीत ठेवा.
मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली आहे. काही कागदपत्र दाखवत ते त्यांची चर्चा करत आहेत. मराठा आरक्षण कक्ष महिनाभरात सुरू करू, असे आश्वासन देखील त्यांनी जरांगे पाटील यांना दिले आहे.
पुण्यात महमदवाडी कृष्णानगर परिसरातील दारूचे अड्डे शिवसेनेकडून उध्वस्त केले. शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी दारूचे अड्डे केले उध्वस्त केले. हडपसर परिसरातील सात जण विषारी दारूमुळे मृत्यू झाल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिकांनी आज सकाळी दोन ते तीन ठिकाणी दारूच्या उध्वस्त केले आहेत
मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरवात केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक. झाला आहे. जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाने रस्ता रोको केला आहे. नाव्हा शिवारात मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला आहे.
मुंबईसह MMR क्षेत्रात सीएनजी पुन्हा वाढला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ केली. तर घरगुती पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजीच्या दरात प्रति एससीएम ५० पैशांची वाढ केली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
पालघर, ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या ते मध्यम सरी आणि सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही सोमवार, मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा 'यलो अॅलर्ट' आहे. गेल्या २४ तासांत केवळ कोकण विभागामध्ये तापमानवाढ नोंदली गेली आहे. मुंबईमध्ये उद्यापासून तीन दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषण करणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.