
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. यातच आता लवकरच कोकणातही ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजापूर मतदारसंघातून राजन साळवी यांना पराभव पत्कारावा लागल्यानंतर ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. पण त्यांनी मातोश्री येथे जात ठाकरेंची भेट घेतली.पण यावेळी मातोश्रीवर जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे
ईव्हीएमवर आधीपासूनच काँग्रेसची शंका आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप करण्यात आला असल्याचा आरोप करून काँग्रेसच्या विदर्भातील आठ विधानसभा मतदरसंघातील उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका सादर केली आहे.
हरियाणामध्ये मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली काँग्रेसचे माजी आमदार सुरेंद्र पनवार यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ईडीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यावरून राज्यमंत्री मनोज जरांगे यांनी मनोज जरांगे वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नका, असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षांतराचे संकेत दिले आहेत. आपण एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही असा इशाराच दिला आहे. जालन्यामध्ये आपल्याच माणसांनी घात केल्याचा आरोपही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आपलं जे झालं, ते 2029 तुमचं होऊ नये म्हणत त्यांनी जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना सावधगिरीचा सल्लाही दिला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मुंबईत अॅक्टिव्ह झाला आहे.बीएमसी निवडणुकीच्या दृष्टीने घाटकोपरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी महायुतीमध्ये आम्हाला या अगोदर योग्य उमेदवारी मिळाली नाही.मात्र, आता मुंबई मनपा निवडणुकीत आम्हाला 60 जागा हव्याच अथवा आम्ही 227 जागांची तयार केली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी शनिवारी(ता.4) परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडबाबत नवी मोठी मागणी केली. आमदार धस यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचा बीडबाबत काही संबंध नाही. आमचा जिल्हा बिनमंत्र्यांचा राहु देत, नाहीतर लोकं क्या हुआ तेरा वादावर येणार आहेतच असं म्हटलं आहे.
भिवंडी येथे शनिवारी (ता.4) आयोजित करण्यात आलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी एकाचवेळी भाविकांची गर्दी वाढल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचे समोर येत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि सीआयडी चौकशीचे निर्णय दिले आहेत. त्यात अत्यंत बारकाईने चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील एकही दोषी आरोपी सुटणार नाही. कानून के हाथ लंबे होते है. नाक दाबल्यावर तोंड उघडलं आणि फरार झालेले आरोपी शरण आले. उरलेल्या आरोपींना देखील पोलीस लवकरच पकडतील. या प्रकरणात विशेष वकील लाऊन फास्टट्रॅक कोर्टात ही केस चालवली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बांदीपोरा जिल्ह्यातील वुलर पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली.
जालना विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्जात माहिती लपवल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तिघांना आरोपींना आज अटक केली. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे असे आरोप केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना आज सीआयडीने न्यायालया पुढे हजर केले असता त्यांनी 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाजप नेते नितीन गडकरी यांनी भाजपवर यूएस आणि थ्रो केला जात असल्याची टीका होत असतानाच सध्याच्या राजकारणाबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी, राजकारणाबद्दल माझ मत फारस चांगल नसून पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक आहे. पण सत्ता गेली की ज्या प्रमाणे जहाज बुडताना आधी उंदीर उद्या मारतात. तसे अनेक जण सत्तेत असणाऱ्या पक्षात प्रवेशासाठी उड्या मारतात असे म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश आले असून महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. या धक्कातून अद्याप काँग्रेस सावरली नसून अनेकांना निवडणुकीत घोळ झाल्याची शंका घेतली आहे. आता काँग्रेसच्या विदर्भातील आठ विधानसभा मतदरसंघातील उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर नागपूर खंडपिठात याचिका सादर केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मी तर म्हणतो त्यांच्या राजीनाम्याची मागणीच गरज नाही. त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. या प्रकरणात ज्यांची नावे आहेत ते कोणाच्या जवळचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यावा, असे परभणीत निघालेल्या मूक मोर्चाला संबोधित करताना खासदार संजय जाधव म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येत आहे. आज हा मोर्चा परभणीमध्ये काढण्यात आला. पुढील मोर्चा मंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी निघणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत आपण आपली नाराजी पक्षप्रमुखांपुढे मांडली, असे साळवी यांनी सांगितले.
एक युट्यूब न्यूज चॅनलची बातमी ट्विट करत 'हे किती धक्कादायक आहे बघा. एका पोलीस अधिकाऱ्याने ऑफ द रेकॉर्ड बोलताना सांगितले की वाल्मिक कराडला खुनाच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी खंडणीची केस तयार करण्यात आली. एकीकडे फरार आरोपी पकडल्याची बातमी तर दुसरीकडे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न. असं जर असेल तर कसा न्याय मिळणार?', असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत मतांसाठी महिलांना लाडक्या बहिणी बनवून पैसे दिले. त्यावेळी कोणतेही निकष नव्हते कारण तेव्हा सत्तेसाठी स्वार्थी महायुतीला मते घ्यायची होती. आता अनेक निकष लावून योजनेतील लाभार्थी बहिणींचे नाव यादीतून काढत आहे, ही बेइमानी आहे.महिला बालकल्याण मंत्री म्हणाले इतर योजनेतील लाभार्थी महिलांना वगळले जाणार, त्यामुळे लाडकी बहिण योजना केवळ मतांसाठी होते हे स्पष्ट झाले, अशी टीका माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
आम आदमी पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांनी पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी दिल्लीकरांसाठी दुसरी घोषणा केली. आपचे दिल्लीत सरकार आल्यास ज्या लोकांना चुकीची पाण्याची बिलं मिळाली आहेत. ती भरण्याची गरज नाही. तर निवडणुकीनंतर ती बिले माफ करू, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी X वर माहिती दिली आहे.
बीडमधील (BEED) संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री देखील असू शकतात. या हत्याकांडातील आरोपींची संख्या 50 वर जाऊ शकते, असा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे परभणी इथं निघालेल्या मोर्चात सहभागी झाले आहे. या हत्याकांडमधील सर्व आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात डॉ. संभाजी वायबसे, त्याची वकील पत्नी आणि आणखी एक जण, अशा तिघांना चौकशीला ताब्यात घेण्याबरोबर समांतर तपासात मुंबईतून (Mumbai) सिद्धार्थ सोनवणे याला देखील बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ सोनवणे याला मुंबईतून ताब्यात घेतलं असून, तो मस्साजोग गावातील रहिवाशी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी, यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी केलेल्या 'रास्ता रोको' आंदोलनात देखील सहभागी झाला होता. त्यामुळे या हत्याकांडाचा लवकरच उलगडा होणार आहे. सिद्धार्थ सोनवणे याने सरपंच देशमुख याची टीप दिल्याची माहिती समोर येत आहे. तर डाॅ. वायबसे हा मुख्य वाँटेड आरोपी सुदर्शन घुले याला पसार होताना केलेली आर्थिक मदत अन् संपर्कात असल्याचे तपासात समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या अटकेवर आणि तो करत असलेल्या मागणींवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार लंके म्हणाले, "आरोपी कुठल्याही प्रकारचा असो. आरोपीला व्हीआयपी सेवा देणे संपूर्णपणे चुकीचे आहे. वाल्मिक कराडला, जर व्हीआयपी सेवा मिळत असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी". मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एसआयटी चौकशीनंतर धनंजय मुंडेंचा निर्णय होईल, या वक्तव्याला महत्त्व नाही. धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच सरकारच्या सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना घडत आहेत. यातून सरकारचे अपयश पुढे येत असल्याची टीका देखील यावेळी खासदार लंके यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काय भूमिका आहे, यावर भाष्य केले. "तिथं जाऊन पत्रकार परिषद घेणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडचे संतोष देशमुख यांच्या हत्या दुःखत आहेत. त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उद्धव ठाकरे हे लवकरच या दोन्ही कुटुंबांना भेटणार आहेत. राजकारण करण्यासाठी नाही, तर आम्ही वाट पाहत आहोत की पोलिस नेमकी काय कारवाई करत आहेत. संपूर्ण अटका झाल्या की आम्ही या दोन्ही कुटुंबांच्या भेटीसाठी जाऊ", असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील दोघा 'वाँटेड' आरोपींची अटक पुण्यातून झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा सवाल उपस्थित केला. या हत्याकांडातील आरोपींच्या अटका पुण्यातूनच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या हत्याकांडाची दिल्लीमध्ये सर्वाधिक चर्चा आहे, असून महाराष्ट्रातील सरकारने पुढे येऊन यावर निवेदन करावे, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी आज परभणीत (Parbhani) सर्वपक्षीय मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा परभणीतील नूतन मैदानातून सकाळी 11 वाजता सुरू होईल. या मोर्चात देशमुख कुटुंब सहभागी होणार आहे. तसेच खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे, भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आदी नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. आतापर्यंत लातूर, बीड, बुलढाणा इथं मोर्चा काढण्यात आले आहेत. आता परभणीत मोर्चा निघत आहे. पुढचा मोर्चा परळी इथं निघेल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
बीडमधील (BEED) मयत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 25 दिवस पूर्ण होत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात पसार असलेल्या तीन आरोपींपैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आरोपींना बीड पोलिसांनी 'वाँटेड' जाहीर केलं होते. पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांची याबाबत थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. या गुन्ह्यात सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलिसांचे पथक तपास करत आहे. सीआयडी आणि एसआटी पथक राज्यासह महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात तपासासाठी गेली होती. यात 'वाँटेड' आरोपींना पकडण्यात यश आल्याचे समजते. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांना 'वाँटेड' जाहीर केले होते. यातीलच सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तसेच अन्य एकाला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थ सोनावणे, असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत पत्रकार परिषदेत नेमके काय खुलासे करतात, याकडे लक्ष लागलं आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या 26 व्या पदवीदान समारंभामध्ये ही पदवी प्रदान केली जाणार आहे. मंत्री विखे पाटील यांनी शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला . यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंत्री विखे पाटील यांना 'जीवन गौरव', तर राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित केले होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, "वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मलाही डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. राजकीय, सामाजिक जीवनात मिळालेल्या संधीमधून समाजासाठी काम करीत आहे. डॉ. बाळसाहेब विखे पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अधिकचे काम करण्यासाठी हा मिळालेला सन्मान माझ्यासाठी एक उर्जा आहे".
अजित पवार (Ajit Pawar) दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई इथं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक होत आहे. या बैठकीत पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर चर्चा होणार आहे. यात अजितदादा पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. त्यामुळे बीडचा पालकमंत्री कोण होणार, यावर चर्चा रंगली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात पक्षाचा पुढील सहा महिन्यांचा कार्यक्रमही घोषित केला जाणार आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांची बैठक शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. शिबिराला राज्यातील 250 ते 300 पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक धोरण पुढे नेण्यासंदर्भात चर्चा होईल. विविध अभ्यासक, विश्लेषकांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.