मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra)-कर्नाटक (Karnatka) सीमा वाद आज आणखी वाढला. कन्नड भाषिक संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी पत्रकार परिषद घेत मराठी भाषिकांवरील अन्याय आणि वाहनांवरील हल्ले येत्या ४८ तासांत न थांबल्यास स्वतः बेळगावला जाण्याचा इशारा कर्नाटक सरकारला दिला. पवारांच्या या इशाऱ्यानंतर ३६ वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. (Sharad Pawar warned to go to Belgaon, the memories of 36 years ago came fresh)
कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या संयमाची मर्यादा पाहू नये. मराठी माणसाचा संयम सुटला तर जे काही होईल, त्याला सर्वस्वी जबाबदार कर्नाटक सरकार राहील, असा सांगतानाच, मराठी भाषिक आणि वाहनांवरील सुरू असलेले हल्ले पुढील ४८ तासांत न थांबल्यास मी स्वतः बेळगावला जाईन, येवून मराठी बांधवांच्या सोबत उभा राहिल, असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज कर्नाटक सरकारला दिला. त्यानंतर पवार यांनी सीमाप्रश्नी ३६ वर्षांपूर्वी म्हणजे १९८६ मध्ये घेतलेल्या भूमिकेची आठवणी पुन्हा ताजी झाली आहे.
सीमा भागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड विषय अनिवार्य केल्याची घोषणा केली होती. त्याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला होता. खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.
पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होते. बेळगावात दाखल होण्यासाठी पवार साहेबांनी एक शक्कल लढविली. ते प्रथम कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेक पोस्टवर पोलिसांनी चौकशी केली; परंतु त्यांना काहीच कळलं नाही. पवार साहेब बेळगावात पोहोचले; पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता.
बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.
साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम जोशी हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय, अशी आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितली आहे.
त्यानंतर शरद पवार यांनी आज दुपारी पवारांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा बेळगावला जाण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.