मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मुलाला (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, याची आम्हालाही खंत आहे. आम्हाला तर कुठं आनंद झाला आहे. आम्ही प्रयत्न खूप केले. मात्र त्यात आम्हाला यश आले नाही. पण, नैसर्गिक मित्रपक्ष, ज्यांच्यारोबरच आपण निवडणुका लढवल्या, त्यांच्याबरोबर आपण कामकाज केले पाहिजे. अशी माझ्यासह ४० ते ५० आमदारांची भूमिका होती, त्यातून हे घडले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. (We also regret that Uddhav Thackeray had to resign as Chief Minister: Eknath Shinde)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडताना ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याचा आनंद त्यांना घ्यायचा असेल तर घेऊ द्या,’ अशी खंत व्यक्त केली होती. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री बनण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलेले नाही. आमदारांची अस्तित्वाची लढाई होती, आपल्या मतदारसंघाला न्याय देऊ शकत नसल्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतली होती. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. महाविकास आघाडीत इच्छा असूनही शिवसेनेला अनेक निर्णय घेता येत नव्हते. आमच्याकडे मंत्रीपदे असूनही कुंचबणा होत होती. काम करण्यास वाव नव्हता, त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. एवढा मोठा निर्णय ५० अमादार घेतात, त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
भाजपत शिस्तीला महत्व
मुख्यमंत्रीपदाबाबत मलाही अनपेक्षित होतं. भाजप तोडफोड करून सत्ता मिळवत असल्याचा दावा पक्षाकडून खोटा ठरवण्यात आला आहे. भाजपकडे संख्याबळ असूनही माझ्यासारख्याला त्यांनी मुख्यमंत्री केले. उपमुख्यमंत्री व्हावे लागल्यामुळे फडणवीस नाराज नाहीत. कारण भाजपत शिस्तीला महत्व असतं. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री स्वीकारले, असे खुद्द फडणवीसांनी सांगितल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
....तर मग कुणाचं सरकार टिकणार?
सुमारे १७० आमदारांचं सरकार टिकणार नाही, तर मग कुणाचं सरकार टिकणार आहे. हे जनतेच्या मनातील सरकार आहे, असा टोला शिंदे यांनी हे सरकार फार काळ टिकणार नाही म्हणणाऱ्यांना लगावला. ठाकरे सरकारचे निर्णय रद्द करण्याबाबत शिंदे म्हणाले की, यामध्ये राग, लोभ काढण्याचा विषय नाही. कुठलेही घेतलेले निर्णय सूडबुद्धीने रद्द करण्याची भूमिका नाही. पर्यावरणाचा समतोल राखून जनतेच्या हिताचे निर्णय घेतली जातील.
तो शरद पवारांच्या मनाचा मोठेपणा
ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केलेल्या कौतुकाबद्दल मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांनी केलेले कौतुक हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जनतेचा गाडा हाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्हीपबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत कायद्याला, नियमाला महत्व आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवू.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.