नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषी कायद्यांवर (Farm Laws) यू-टर्न घेतला असून, हे कायदे मागे घेण्याचे जाहीर केले आहे. भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते व मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी यावरून मोदींनी कोंडीत पकडले आहे. शेतकऱ्यांनी आता हमी भावाची मागणी लावून धरली असताना मलिक यांनी त्यालाच उघड पाठिंबा देत मोदींना तोंडावर पाडले आहे.
राज्यपाल मलिक हे मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर उघडपणे टीका करीत आहेत. त्यांनी आधीही उघडपणे शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारला सुनावले होते. त्यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी केल्यानंतर आता शेतकरी हमी भावाला कायदेशीर आधार द्यावा, अशी मागणी करीत आहेत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
यावर राज्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी मान्य करून घेऊन शेतकऱ्यांनी आपापल्या घरी जावे, अशी गुगली टाकली आहे. त्यांनी एकप्रकारे शेतकऱ्यांच्या हमी भावाच्या मागणीला जाहीर पाठिंबा देऊन आपल्याच सरकारची कोंडी केली आहे. शेतकऱ्यांनी हमी भावाच्या पलिकडे ताणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. सरकारमधील सर्व घटक हमी भावाच्या मागणीवर गप्प असताना मलिक यांनी यावर टिप्पणी करून सरकारला अडचणीत आणले आहे.
राज्यपाल मलिक नुकतेच म्हणाले होते की, शेतकरी आंदोलनामुळे भाजपला उत्तर प्रदेशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे. हे आंदोलन वर्षभर सुरू असून, आतापर्यंत यावर तोडगा निघायला हवा होता. नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये होते तेव्हा शेतकऱ्यांच्या हित पाहणारे होते. परंतु, आता देशाचा प्रवास अशा दिशेने सुरू आहे की शेतकऱ्यांशी चर्चाच बंद झाली आहे. आंदोलनात मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल मोदींनी कधीही शोकसंदेश जाहीर केला नाही. यामुळे मला अतिशय त्रास झाला. शेतकरी येथून मोकळ्या हाताने उठून घरी जाणार नाहीत. त्यांनी 3-4 वर्षे राहावे लागले तरी ते येथे राहतील.
राज्यपाल मलिक यांनी इशारा दिल्यानंतर 24 तासांतच योगायोगाने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला होता. पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या घटनेचा मोठा परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू झाली आहे. यामुळे सत्यपाल मलिक यांचा इशारा सूचक मानला जात होता. अखेर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेऊन शेतकरी आंदोलन शमवण्याचे पाऊल उचलले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.