
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या आठवड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनास बसले होते. जरांगे यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (३१ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या जरांगे यांच्या भेटीसाठी पोचल्या. मात्र, यावेळी सुप्रिया सुळे यांना मराठा बांधवांनी घेराव घातला. आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी यावेळी शरद पवारांविरोधात सुद्धा घोषणाबाजी केली. घटना एकदम साधी आणि स्वाभाविक आहे.
तीन दिवस मराठा समाजाचा प्रचंड महासागर मुंबईत पोचला असताना शासकीय पातळीवर त्याची कोणतीच दाखल घेतली जात नाही. त्यामुळे एकूणच व्यवस्थेविरोधात निर्माण झालेला रोष बाहेर पडणे स्वाभाविक होते. त्यातच सर्वच राजकीय पक्ष या आंदोलनापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करीत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाला दिलेली भेट योग्य होती का, हा प्रश्न निर्माण होतो.
खा. सुळे जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात पोचल्या, त्यांनी मंचावर जाऊन जरांगे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते झोपलेले असल्याने सुळे यांनी मराठा समन्वयकांसोबत चर्चा केली. जरांगे यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे उपोषणस्थळावरून निघत असताना त्यांची गाडी मराठा बांधवांनी अडवली. त्यावेळी काही आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. काहींनी सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. आंदोलकांचा इतका मोठा रोष असताना सुळे यांनी संयम ढळू दिला नाही. त्या चारही बाजूने आंदोलकांना हात जोडून नमस्कार करतच आझाद मैदान येथून निघून गेल्या.
वास्तविक, मराठा समाजाचा रोष पाहता अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलकांना भेट देण्याचे टाळले. जे मोजके नेते भेटले ते केवळ त्यांच्या मतदार संघातील मतदानाची गणिते आणि त्यामुळे निर्माण झालेली त्यांची अपरिहार्यता असू शकते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेण्याचे धाडस केले हे विशेष. कारण सुळे यांना त्यांच्या मतदार संघातील कोणतेही राजकीय समीकरण जुळवायची होते याची अजिबात शक्यता नाही. किंबहुना त्यांच्या मतदार संघात आतापर्यंत असा प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही.
मराठा मोर्चे निघायला लागले तेव्हापासून याच्या मागे महाविकास आघाडीचे नेते आहेत असा प्रचार सुरु होता. जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा आणि अन्य मदत मिळत असल्याचा थेट आरोपही करण्यात आला.
शरद पवार देशाच्या पातळीवर मराठा नेते असल्याचे बोलले जात असले, तरी त्यांचे राजकारण मराठा या जातीभोवती कधीच गुरफटलेले नाही. उलट सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा समावेशक नेता अशीच त्यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल आहे. त्यामुळे सुळे यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे शरद पवार या आंदोलनाच्या मागे आहेत, या आरोपातील हवा निघून जाण्यास मदत झाली असावी.
सुप्रिया सुळे यांनी या मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेतल्याने एका विशिष्ट समाजाला पाठिंबा देणे किंवा त्यांच्या विषयी सहानुभूती व्यक्त करणे म्हणजे अन्य ओबीसींचा रोष ओढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे अन्य कोणतेही मराठा नेते या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेटले नाहीत. पक्षाचे तरुण नेते रोहित पवार यांनी सुद्धा शिताफीने जरांगे यांची भेट घेण्याचे टाळले. कदाचित नेते शरद पवार यांच्या सल्ल्याने त्यांनी या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवले असणे शक्य आहे. एक मात्र नक्की ज्या ठिकाणी सत्ताधारी एखाद्या आंदोलनाची दखल घेत नाहीत अशा वेळी विरोधी पक्षाच्या खासदाराने आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस करणे यात गैर काय?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.