
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 50 वर्षे तिरंगा का फडकवला नाही? अशी टीका केली जाते, आरएसएस ने 1950 ते 2002 पर्यंत नागपूर येथील रेशीम बाग येथे असलेल्या संघाच्या मुख्यालयावर तिंरगा फडकावला नाही. त्याची कारण काय आहे. हे जाणून घेऊयात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदा १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री किंवा १५ ऑगस्ट १९४७ च्या सकाळी, म्हणजेच स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवला नाही, त्यावेळी संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर गुरुजी माधवराव गोळवलकर हे प्रमुख होते. त्यांचा आग्रह होता की संघ हा सामाजिक-सांस्कृतिक संघटन आहे, तो राजकीय नाही; त्यामुळे सरकारी सत्तेचे प्रतीक असलेला ध्वज फडकवणे हे त्यांच्या मते आवश्यक नव्हते. त्याऐवजी, आरएसएसमध्ये भगवा ध्वज हा संघाचा गुरुद्वज म्हणून पूज्य मानला जातो. जो त्यांच्या विचारांचा आणि परंपरेचा प्रतीक आहे.
१९४७ ते १९४९ या काळात –संघाने आपल्या नागपूर मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांनी संघावर राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करण्याचा आरोप केला.२६ जानेवारी १९५० (भारतीय प्रजासत्ताक दिन) या दिवशी प्रथमच संघाने नागपूरच्या रेशीमबाग मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकवला.कारण २६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधान स्वीकारले, आणि तिरंगा हा संविधानमान्य राष्ट्रीय ध्वज झाला, हे त्यामागील कारण असल्याचे राजकीय विश्लेषक दयानंद नेने यांनी सांगितले. त्या दिवशी RSS ने प्रथमच सार्वजनिकरीत्या राष्ट्रीय ध्वज फडकवला.
आरएसएस ही राजकीय संस्था नसल्याने, त्यांनी राज्यसत्तेच्या प्रतीकांपासून अलिप्तता राखली. त्यांच्या सर्व प्रमुख कार्यक्रमांमध्ये 'गुरुपूजन' म्हणजे भगव्या ध्वजाला नमन हीच मुख्य परंपरा होती. त्यामुळे १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी सारखे राजकीय सण संघाने आपल्याकडे औपचारिक स्वरूपात साजरे केले नाहीत. पण याचा अर्थ राष्ट्रध्वजाचा अनादर नव्हता. संघाने अनेकदा स्पष्ट केले की, तिरंगा हा राष्ट्राचा सन्मान आहे; पण भगवा हा संस्कृतीचा प्राण आहे,असे नेने यांनी सांगितले.
१९४७ नंतर, विशेषतः २००२ पासून, संघाने प्रत्येक शाखा आणि मुख्यालयात तिरंगा फडकवण्याची परंपरा नियमित केली. आज RSS आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये तिरंग्याचा पूर्ण सन्मान आणि अभिमानाने फडकवला जातो. तिरंगा हा नव्याने उदयास आलेल्या देशाचा राजकीय झेंडा आहे; पण भगवा ध्वज हा भारतभूमीच्या शाश्वत संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. म्हणून त्यांनी तिरंग्याला विरोध केला नाही, पण आपल्या संघकार्यक्रमात भगव्या ध्वजालाच ‘गुरुस्थान’ दिले, असे संघ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये 14 ऑगस्ट 1947 रोजी लिहिले गेले की, “हा तिरंगा आम्ही कधीच स्वीकारणार नाही आणि याचा सन्मानही करणार नाही.” त्यांचे म्हणणे होते की, “तीन रंगांचा हा झेंडा देशासाठी हानिकारक आहे आणि त्याचे वाईट मानसिक परिणाम होतील.” गोळवलकरांनी ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये लिहिले आहे की, “तिरंगा आपल्या इतिहासावर किंवा वारशावर आधारित नाही. हा फक्त वेगवेगळ्या समुदायांना खूश करण्यासाठी बनवला गेला – भगवा हिंदूंसाठी, हिरवा मुस्लिमांसाठी आणि पांढरा इतरांसाठी.”
काँग्रेसने 1930 मध्ये लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकवला, तेव्हा RSS ने भगवा झेंडा फडकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी भगवा हाच खरा राष्ट्रीय झेंडा होता. परंतु, 2018 मध्ये विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात सांगितले की, “तिरंगा आमचा अभिमान आहे आणि स्वातंत्र्याची सर्व प्रतीके आम्हाला मान्य आहेत.”
RSS ने 2002 पर्यंत नागपूर मुख्यालयावर तिरंगा फडकवला नव्हता. आरएसएस समर्थक म्हणतात की, तेव्हा सर्वसामान्यांना झेंडा फडकवण्याची परवानगी नव्हती. परंतु, टीकाकारांचे म्हणणे आहे की, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला सर्वत्र झेंडे फडकत असताना RSS ने का टाळाटाळ केली?
1963 मध्ये भारत-चीन युद्धानंतर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये RSS ला आमंत्रित करण्यात आले, तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या हातात तिरंगा दिसला. लेखक धीरेंद्र झा यांनी लिहिले आहे की, “ही परेड लोकांची परेड होती आणि सर्वांच्या हातात तिरंगा देण्याचे नेहरूंनी आदेश दिले होते. पण RSS नंतर म्हणायला लागले की, नेहरूंनी आम्हाला खास बोलावले.” आज, 2025 मध्येही तिरंगा RSS च्या कार्यक्रमांत नियमित दिसतो, पण त्यांचा भगव्यासोबतचा नाताही कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.