
चिपळूण : मुझफ्फर खान
कोकणात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सुरू झालेली पडझड अजून थांबलेली नाही. एक-एक बालेकिल्ला ढासळत जात आहे. काही महिन्यांपूर्वी राजकीय स्पर्धेतील या दमदार पक्षासमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणारे बिनीचे नेते आमदार भास्कर जाधव, ठाकरे सेनेचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्यापुढे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
स्थापनेपासून शिवसेना पर्यायाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकण यांचे वेगळे नाते राहिले आहे. सुरुवातीला मुंबईत पक्ष वाढवत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून झुंजणारे शिवसैनिक प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्गातील होते. रायगडनेही या पक्षाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. पुढे शिवसेना महाराष्ट्रभर पसरवण्याच्या शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नाला याच कोकणने बळ दिले. या पक्षाने कोकणात अनेक चढउतार पाहिले असले, तरी 'मातोश्री'च्या मनात कोकणासाठी कायमच एक हळवा कोपरा राहिला आहे. कोकणानेही या पक्षाला तितकेच निस्वार्थी प्रेम दिले; मात्र आज 'मातोश्री'शी जोडलेली ठाकरे शिवसेना याच कोकणात अस्तित्वाची लढाई लढत आहे.
मुंबईच्या राजकारणात स्थिरावलेल्या चाकरमान्यांना गावाकडे जाण्याचा आदेश निघाला. यानंतर अगदी मंडणगडपासून सावंतवाडीपर्यंत विधानसभेच्या राजकारणात मुंबईकर चाकरमान्यांनी सक्रिय प्रवेश केला. मुंबईकर चाकरमानी असलेले नारायण राणे 1990 च्या निवडणुकीत कणकवलीमधून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर शिवसेनेचा झंझावात वाढतच गेला. सूर्यकांत दळवी, गणपत कदम, रामदास कदम, भास्कर जाधव, शंकर कांबळी, शिवराम दळवी, रवींद्र माने अशी आमदारांची फौज भगवा घेऊन कोकणातून विधानसभेत गेली. हळूहळू जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सब कुछ शिवसेना अशी स्थिती तयार झाली.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेच्या या वर्चस्वाला साधारण 2004 मध्ये भास्कर जाधव यांच्या रूपाने पहिल्यांदा धक्का बसला. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते प्रथम अपक्ष लढले नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर पुन्हा ते शिवसेनेत आले आहे. कोकणचे नेतृत्व करणारे नारायण राणे 2007 मध्ये पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले.
त्यांच्या या निर्णयाने अवघ्या काही तासांत सिंधुदुर्गातील शिवसेना जवळपास शून्याकडे आली. 2005 ला झालेल्या पोटनिवडणुकीत राणे आणि कांबळी हे दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर शिवसेनेची अनामत जप्त करत निवडून आले. यावेळी प्रकृती ठीक नसतानाही स्वतः शिवसेनाप्रमुख मालवण सभा घ्यायला आले होते. तरीही पक्षाचा दारुण पराभव झाला. यानंतर सिंधुदुर्गात काँग्रेसचे पर्व सुरू झाले.
या घडामोडीचा रत्नागिरीवर मात्र फारसा परिणाम झाला नाही. तेथे भगव्याची पकड कायम राहिली; मात्र 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंच्या रुपाने काँग्रेसच्या झालेल्या विजयाने पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का बसला. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा चाकरमानी असलेल्या विनायक राऊत यांना सिंधुदुर्गात पक्ष बांधणीसाठी रवाना केले. शिवसेनेच्या पुन:उभारणीत राऊतांना यश आले. नवे कार्यकर्ते पक्षाला जोडले गेले. यातून 2014 ला राऊत लोकसभेवर निवडून गेले. यानंतरच्या विधानसभेत खुद्द राणेंना पराभवाचा धक्का पचवावा लागला. शिवसेना पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोहोचली.
गेल्या अडीच वर्षात झालेल्या राज्यस्तरीय घडामोडींनी राजकारण पुन्हा बदलले. शिवसेनेत फूट पडली. पण भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी असे काही मात्र ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. लोकसभा आणि त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला कोकणातून पुन्हा ताकद मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र लोकसभेत राऊत यांच्या पराभवाने पुन्हा गणिते बदलू लागली.
शिवसेनेतील अंतर्गत कलह वाढू लागला. 2024 च्या निवडणुकीने आणलेली त्सुनामी ठाकरे शिवसेनेला कोकणातून उद्ध्वस्त करणारी ठरली. लोकसभेत नारायण राणे आणि विधानसभेत नीतेश राणे व नीलेश राणे यांच्या विजयाने पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेराज सुरू झाले. रत्नागिरीत माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता धरला. जिल्हाप्रमुख विलास चाळके, बंड्या साळवी यांनीही पक्ष सोडला आहे. माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी शिंदे शिवसेनेचा रस्ता धरला. दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
आताही ठाकरे शिवसेनेचे सैनिक शिंदे शिवसेना आणि भाजपकडे आकर्षित होत आहेत. या भागातून निवडून आलेले एकमेव आमदार भास्कर जाधव यांचा गुहागर व चिपळूणमध्ये असलेला प्रभाव वगळता इतर भागात कार्यकर्त्यांना वाली नसल्याचे चित्र तयार झाले आहे.
शिवसेना अगदी तळागाळातील लोकांना जोडून मजबूत होणारी संघटना मानली जाते. आमच्याकडे नेते नाहीत पण कार्यकर्ते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक अजूनही गावोगावी आहे. हेच दिवस राहणार नाही पुन्हा चांगले दिवस येतील. यात शंका नाही.
- भास्कर जाधव, आमदार, गुहागर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.