
Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्वभावात गेल्या काही दिवसात खूप बदल केला आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर दादांनी त्यांच्या स्वभावात केलेला बदल जाणवून येत आहे. वर्षभरापूर्वीचे रागीट अजितदादा आठवतात का ते पहा? प्रत्येकवेळी ते भडकत होते. मात्र, त्यांनी आता स्वभावात ३६० डिग्रीमध्ये बदल करून घेतला आहे. सध्या त्यांनी रागावणे पूणपणे बंद केले आहे. आता ते विनोद करतात, चिमटे काढतात आणि आता प्रत्येकाशी हसून बोलत असतात. त्यांनी स्वभावात विलक्षण बदल करून घेतला आहे. सध्या त्यांचे हे नवे रूप पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे. रागीट असलेले दादा आता हसरे झाले आहेत.
दादांनी हा खूप मोठा बदल त्यांच्या स्वभावात करून घेतला आहे. त्यांनी सर्वांर्थाने प्रतिमा बदल केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्याचा त्यांना फायदाच होणार आहे, हे सर्व सांगण्याचे कारण एवढेच की नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या स्वभावात कधी बदल करणार ? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. यावेळी अजितदादांनी कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, ती सवय करून घेतली पाहिजे, हा मोलाचा सल्ला या निमित्ताने दिला. त्यामुळे या सल्ला कितपत कोकाटेंच्या पचनी पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikarao Kokate) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होतं. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असा सवाल करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना आणि शेतकरी मदतीसाठी आशेनं सरकारकडे पाहत असताना कोकाटे यांचे असे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
एकीकडे ढेकळांच्या पंचनाम्याचं त्यांचं वक्तव्य चर्चेत असतानाच कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारी टिप्पणी केली होती. “कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खातं दिलंय”, असं ते म्हणाले. कोकाटे यांच्या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मी असं काही बोललोच नाही” असे म्हणत त्यांनी सारवासारव केली आहे.
“माणिकराव कोकाटेंना अजूनही गोष्टी मनात ठेवायची सवय नाही. आता मला जास्त महागात पडतंय. शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. याबाबत मी मागेही त्यांना सांगितले होते. शेतकरी हा बळीराजा आहे, आपला पोशिंदा आहे. सगळ्या गोष्टी आम्हालाही माहीत आहेत, आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून का दाखवायच्या? मनात ठेवायच्या”, अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.
एवढेच नाही तर यापूर्वी देखील कोकाटे यांनी वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतला आहे. एप्रिल 2025 मध्ये कोकाटे यांनी दावा केला की, शेतकरी कर्जमाफी किंवा पीक विम्याच्या रकमांचा वापर लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांवर करतात. या विधानामुळे शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि कोकाटे यांनी त्यानंतर माफी मागितली होती.
त्याशिवाय कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर असा आरोप केला की, काही शेतकरी मुद्दाम कर्जफेड टाळतात जेणेकरून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. या विधानामुळेही शेतकरी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि सरकारने कोकाटे यांच्या वतीने माफी मागितली .या सर्व विधानांमुळे कोकाटे यांच्यावर शेतकरी संघटनांकडून आणि विरोधकांकडून टीका झाली आहे.
त्यामुळेच अजित पवार यांनीही कोकाटे यांना "काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात' असा सल्ला दिला आहे. या सल्ल्याचे पालन येत्या काळात कोकाटे यांनी केले तर नक्कीच त्यांच्या अडचणी दूर होतील, मात्र त्यासाठी त्यांना हा सल्ला आचरणात आणावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.