Thane BJP Sarkarnama
ठाणे

Thane News : भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात काँग्रेस छोडो अभियान; शेकडो काँग्रेसी भाजपमध्ये...

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाणे जिल्ह्यात येत असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला होता.

Pankaj Rodekar

Thane Congress News : काँग्रेसची भारत जोडो यात्रा ठाण्यात आली असताना ठाणे जिल्ह्यातील शेकडो काँग्रेसींनी राहुल गांधींना टाटा ...बाय बाय करून शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बी. के. भगत यांचे सुपुत्र काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या मुंब्रा, रेतीबंदर भागातील शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. अशाप्रकारे ठाण्यात काँग्रेसला धक्का देण्याचे काम भाजपने सुरू केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाणे जिल्ह्यात येत असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला होता. दुसरीकडे आता राहुल गांधींच्या आगमनाचा मुहूर्त साधून ठाणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने ठाण्यात उरली सुरली कॉंग्रेसदेखील आता रसातळाला जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल भगत काँग्रेस शहर सरचिटणीस संजय शिंदे, प्रदेश काँग्रेस ओबीसी कोकण विभाग सरचिटणीस सुधीर जाब्रे, वार्ड अध्यक्ष सुशांत कांबळे, मनोज प्रजापती आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना अखेरचा टाटा ...बाय बाय करून कॉंग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले. हा पक्ष प्रवेश खोपट येथील भाजप कार्यालयात पार पडला.

या वेळी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भूजबळ, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, कैलास म्हात्रे, कुणाल पाटील आदी उपस्थित होते. या वेळी आमदार संजय केळकर यांनी काँग्रेसचे दिवंगत आमदार बी. के. भगत यांचे सुपुत्र असलेल्या अनिल भगत यांचे भाजपमध्ये स्वागत केले. अनिल भगत हे चळवळीतील नेते आहेत. आज राहुल गांधी ठाण्यात असताना त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींचे काम बघून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आता भाजपमध्ये येत आहेत. एक प्रकारे केंद्र सरकारच्या कामाचीच ही पावती आहे. काँग्रेसने केवळ गरिबी हटावचा नारा दिला, पण मोदी सरकारने गरीब कल्याण योजना राबवून गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय दिला, असे आ. केळकर यांनी सांगितले. दरम्यान, सध्या काँग्रेस नेतृत्वहीन बनली असून राहुल गांधी ठाण्यात असताना काँग्रेसवरील राग व्यक्त करण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे अनिल भगत यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT